

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नागपूरमध्ये ज्येष्ठ नेते नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी आणि विलास मुत्तेमवार यांची भेट घेऊन पक्षातील हालचालींना वेग दिला आहे.
नाना पटोले पक्षापासून अलिप्त राहिल्याने आणि त्यांना नवी जबाबदारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे संकेत आहेत.
ओबीसी समाजाच्या मोर्चात सपकाळ यांनी सहभाग घेतला नाही, त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद आणि नव्या गटबाजीबाबत चर्चेला उधाण आले आहे.
Nagpur, 27 October : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज माजी मंत्री तथा उत्तर नागूरचे आमदार नितीन राऊत यांच्या घरी चहापान घेतले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या आजी-माजी ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून या मागे कुठलाही राजकीय अजेंडा नसल्याचं सांगण्यात आले. असे असले तरी काँग्रेसमध्ये काहीतरी शिजत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
नितीन राऊत (Nitin Raut) यांनीसुद्धा ज्येष्ठत्वाच्या नात्याने प्रदेशाध्यक्षांनी आपली भेट घेतली असल्याचे सांगितले. ज्यांना कोणाला शंका येत असले त्यांनी या भेटीमागचा अजेंडा शोधून काढावा, असे सांगून त्यांनी या भेटीत झालेल्या चर्चेवर अधिक बोलण्यास नकार दिला.
प्रदेशाध्यक्ष हे राज्यातील पक्षाचे सर्वोच्च पद समजले जाते. प्रोटोकॉलनसुर मंत्री व आमदार प्रदेशाध्यक्षांना भेटायला जातात. मात्र, नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) हे नितीन राऊत यांच्या घरी गेले होते. येथूनच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याशी फोनवरून बातचित केली. तत्पूर्वी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचीही काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात नितीन राऊत राज्याचे ऊर्जामंत्री होते. मोदी लाटेतही त्यांचा भाजपला पराभव करता आला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले. आतापर्यंत ते चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मध्यंतरीच्या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा होते.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या कार्यक्रमापासून अलिप्त आहेत. पक्षाने त्यांना अद्याप कुठलीच जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अखिल ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा काढाला. त्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष दोन दिवस नागपूरला होते. मात्र त्यांनी मोर्चाबाबात एकही शब्द उच्चारला नाही. ते मोर्चात सहभागीसुद्धा झाले नाहीत.
ओबीसी समाजाचा मोर्चा हा काँग्रेस पक्षाच नव्हता, असा दावा केला जात आहे. मात्र, मोर्चात काँग्रेसचे विदर्भातील सर्वच प्रमुख नेते सहभागी झाले होते. या सर्व घडामोडी बघता काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याकरिताच प्रदेशाध्यक्षांनी ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असल्याचे बोलले जात आहे.
1. सपकाळ यांनी कोणत्या नेत्यांच्या भेटी घेतल्या?
त्यांनी नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी आणि विलास मुत्तेमवार यांची भेट घेतली.
2. नाना पटोले सध्या का चर्चेत आहेत?
ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असून, नाराज असल्याची चर्चा आहे.
3. ओबीसी समाजाच्या मोर्चात काय घडलं?
मोर्चा काँग्रेसचा नसल्याचं सांगितलं गेलं, पण अनेक प्रमुख काँग्रेस नेते सहभागी झाले.
4. या भेटींमागील मुख्य कारण काय असू शकतं?
पक्षातील गटबाजी मिटवून ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला घेण्यासाठी सपकाळ यांनी भेटीगाठी सुरू केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.