
Amravati, 08 May : महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कितीही एकत्र असल्याचे माध्यमांसमोर येऊन सांगत असले तरी वस्तुस्थिती ती नाही, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. कॅमेऱ्यासमोर येऊन ‘आम्ही किती एकजूट आहोत,’ हे दाखण्याचा प्रयत्न दोघेही करतात. मात्र, वेगाने घडणाऱ्या घडामोडींमुळे त्यावर आपोआप पाणी फिरले जात आहे. एकमेकांच्या विरोधात जोदार मोर्चेबांधणी होताना दिसून येत आहे. शिंदेंनी आता फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात लक्ष घातले असून त्यांच्या निकटवर्तीय आमदाराच्या विरोधात जमवाजमवी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला गती येण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सहकारी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गृहविभाग आणि पोलिसांबाबत केलेले विधान हे मोठ्या धाडसाचे होते. त्यावर खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, शिंदे यांच्या पाठबळाशिवाय गायकवाडांकडून हे विधान होऊ शकणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात केलेल्या विधानाची राज्यात जोरदार चर्चा रंगली होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घातल्याशिवाय शिरसाट महायुतीमधील शीर्षस्थ असणाऱ्या तीन नेत्यांपैकी एका नेत्याविषयी एवढं मोठं विधान करण्याचे धाडस करू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या परवानगीनंतरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे फडणवीसांच्या संमतीनेच शिंदेंच्या मंत्र्यांच्या विभागाचा निधी वळविला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तत्पूर्वी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडे सोपविण्याची परंपरा असताना फडणवीसांनी सुरुवातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे हे पद दिले होते. तसेच, भाडेतत्त्वावर १२०० बसेस घेण्याचा निर्णयही फडणवीसांनी बदलला होता. तसेच मागील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही निम्माच झाला होता, त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावण्याचे काम जोरदारपणे सुरू असल्याचे दिसून येते.
एकनाथ शिंदे हेही भाजपला आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. पहलगाम हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप परत आणण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, त्या ठिकाणीही एकनाथ शिंदेनी कुरघोडी केली. प्रत्यक्ष शिंदे हे काश्मीरमध्ये गेले होते. त्या ठिकाणावरून त्यांनी काही नागरिकांना आणले होते. मात्र, हा राजकीय कुरघोडीचाच प्रयत्न होता.
एकनाथ शिंदे हेही भाजपला आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. पहलगाम हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप परत आणण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, त्या ठिकाणीही एकनाथ शिंदेनी कुरघोडी केली. प्रत्यक्ष शिंदे हे काश्मीरमध्ये गेले होते. त्या ठिकाणावरून त्यांनी काही नागरिकांना आणले होते. मात्र, हा राजकीय कुरघोडीचाच प्रयत्न होता.
अपक्ष निवडून आलेल्या रवी राणांनी देवेंद्र फडणवीस यांचे कायम समर्थन केलेले आहे. आता त्याच राणांच्या विरोधात शिंदे मैदानात उतरले आहेत. राणांच्या विरोधात २०१९ मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणाऱ्या प्रीती बंड यांनी सुमार ७५ हजार मते घेतली होती. त्या वेळी राणा हे १५ हजार मतांनी जिंकले होते.
पुढे २०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी बंड यांना उमेदवारी नाकारली होती, तरीही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत दोन नंबरची मते घेतली होती. त्यामुळे बंड यांचे बडनेरामधील राजकीय ताकद दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. त्याच बंड यांच्या माध्यमातून शिंदेंनी फडणवीसांच्या माणसाला घेरण्याच्या तयारी चालवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.