
Amravati, 08 May : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे माझं घरं होतं. आपल्या घराची प्रत्येक जण वाट पाहत असतं. कुणीतरी बोलवावं, असं वाटत हेातं. पण, विधानसभा निवडणुकीला आता सहा महिने झाले आहेत. मी सहा ते सात महिने वाट पाहिली; पण ठाकरेंकडून बोलावणं आलं नाही. ‘घरसे बुलावा नही आयेगा,’ असं जेव्हा वाटलं, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निकालाच्या दिवशी ज्या आपुलकीने चौकशी केली, त्या एकाच गोष्टीमुळे त्यांच्यासेाबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी खंत व्यक्त करतानाचा बडनेरा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या प्रीती बंड यांनी आगामी राजकीय प्लॅनही सांगितला.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वलगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून संजय बंड हे तीन वेळा निवडून आले होते. तसेच, ते दहा वर्षे जिल्हाप्रमुखही होते. त्यांच्या पत्नी प्रीती बंड यांनीही दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष निवडणूक लढविल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा पक्षात घेतले जाईल, या प्रतीक्षेत त्या होत्या. पण, ठाकरेंकडून विचारणा न झाल्याने व्यथित होऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रीती बंड (Preeti Band) म्हणाल्या, अपक्ष निवडणूक लढविल्याने मला शिवसेनेतून (Shivsena) काढून टाकण्यात आले होते. मी जरी मनापासून ठाकरे गटात होते, तरी मला त्यांनी बाजूला केले होते.विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी गेली सहा ते सात महिने वाट बघितली. कुठुन तरी घरून (ठाकरे गट) आपल्याला बोलावले जाईल, असे वाटत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा माझ्यासाठी घरचं आहे आणि आपल्या घराची प्रत्येक जण वाट पाहत असतं, कुणीतरी बोलवावं. पण सहा महिने झाले अजून कोणी बोलावले नाही.
गेली सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत मला बऱ्याच जणांनी पक्षप्रवेशासाठी संपर्क केला. मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘पीए’चा फोन आला होता. ताई तुम्हाला इतकी मतं मिळाली आहेत, तुमच्या लक्षात असू द्या की, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नक्की विचार करा. पण मी तेव्हा लक्ष दिलं नाही, असेही बंड यांनी नमूद केले.
प्रीती बंड म्हणाल्या, मला तेव्हा वाटलं होतं की, मला माझ्या घरचं बोलावतील. सहा महिन्यांनंतरही मला बोलावले नाही, तेव्हा मला असं वाटलं की, ‘घरसे बुलावा नही आयेगा,’ तेव्हा मी ठरवलं की काहीतरी आपल्याला करावं लागेल. मला अनेक पक्षांकडून विचारणा झाली. पण, शिवसेना शिंदे गट हा शिवसेना, भगवा आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जवळची वाटली, त्यामुळे मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
निवडणुकीच्या एका महिन्यानंतर मला ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले होते. मी ठाकरेंना भेटायला गेलेही होते. पण त्या भेटीनंतरही मला वाटलं नाही की, ते मला शिवसेनेत घेतील, असेही बंड म्हणाल्या.
'त्या' एकाच गोष्टीमुळे मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला
मला ज्या व्यक्तीकडून मतमोजणीच्या दिवशी पहिला फोन येतो. ज्या आपुलकीने त्यांनी माझी विचारपूस केली, त्या गोष्टीमुळे मी शिंंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मला उद्धव ठाकरेंकडून निकालाच्या दिवशी नाही. पण त्यानंतर मला अपेक्षा होती की एकतरी फोन येईल. पण ज्या आपुलकीने शिंदेंनी माझी विचारपूस केली, त्या एकाच गोष्टीवर मी त्यांच्यासोबत गेले, असेही प्रीती बंड यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.