
Nagpur, 19 May : नागपूर विभागात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नागपूर जिल्ह्यातील दलालांची नावे आपल्याकडे आहेत, त्यांची चौकशी केल्यास या घोटाळ्यामागील सूत्रधार आणि कोट्यवधींचा गैरव्यवहार उघडकीस येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याशी संबंधित राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्था निर्माण झाली आहे.
भाजपच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात घडलेल्या ‘व्यापम' घोटाळ्या प्रमाणेच नागपूर विभागातील शिक्षण घोटाळा आहे, असे सांगून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. देशमुख यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती मोठया प्रमाणात असल्याचे सूचित केले आहे. पोलिस जरी या गोष्टींचा तपास करीत असले तरी त्यांना शिक्षण विभागात नेमकी भरती कशी होते, याची पूर्ण माहिती नसल्याने या तपासात शिक्षक विभागातील तज्ज्ञांची मदत घ्यावी. तसेच, कोणत्या बाबींचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षक भरती घोटाळा (Teacher recruitment scam) प्रकरणात नागपुरातील सदर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, समांतररित्या या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांचा सायबर विभागसुद्धा करीत आहेत. या तपासात अनेक गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने शिक्षकांची भरती करताना अनेक खोटी कागदपत्रं तयार करण्यात आली आहेत. हा घोटाळा नियोजित पद्धतीने झाला असून यात शिक्षण विभागातील अधिकारी, संस्था चालक व दलाल यांचा समावेश आहे.
शिक्षक भरती घोटाळा कसा झाला आणि तपासात कोणत्या गोष्टी समोर येणे आवश्यक आहे, याची संपूर्ण यादीच त्यांनी आपल्या पत्रासोबत पोलिस आयुक्तांना दिली आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्रात २ मे २०१२ पासून शिक्षक पदभरती बंदी असताना विशेष बाब म्हणून बोगस पद्धतीने शासन स्तरावरून मान्यता आणून नियुक्त्या करण्यात आल्या, तसेच शासन निर्णय, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑगस्ट २०१३ पासून निर्गमित असताना त्यापूर्वी डी. एड. झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना फसवून बँक डेटमध्ये नियुक्त्या दाखवून शासनाची फसवणूक केली आहे.
अनेक नियुक्त्यांमध्ये मयत शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने वैयक्तिक मान्यता केल्या आहेत व त्याआधारे वेतन पथक अधीक्षक, शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या संगनमताने बोगस शिक्षक भरती घोटाळा सुनियोजित पद्धतीने केलेला असल्याचेही अनिल देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले. या भरतीसाठी नागपूर जिल्हातील प्रत्येक तालुक्यांत अनेक दलाल सक्रीय होते. त्यांच्या माध्यमातून भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अनेक तालुक्यातील दलालांची नावे माझ्याकडे आली आहेत, त्यामुळे तालुका स्तरावर ज्या दलालांच्या मार्फेत ही बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे, त्यांची चौकशी केल्यास अनेक गोष्टी समोर येतील आणि नेमका किती कोटींचा हा घोटाळा झाला आहे, हेही समोर येईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.