नागपूर : उद्धव ठाकरे सेनेचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक दीपक कापसे, माजी नगरसेवक नाना झोडे, श्रीकांत कैकाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शिवसेनेनं नागपूर महापालिकेची निवडणूक काँग्रेसकडे २० जागांची मागणी केली आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे तीन उमेदवार काँग्रेसने पळवले आहेत.
दीपक कापसे यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सर्वच कार्यकर्ते मूळचे काँग्रेसचेच आहेत. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते खंदे समर्थक आहेत. मागील महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या तिकिटे कापण्यात आल्या होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दीपक कापसे यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर चतुर्वेदी यांचे सुपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांना यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत पाठवले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यांच्यासोबत तिकीट कापलेले अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे सेनेत सहभागी झाले होते. या दरम्यान, राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी शिंदे सेनेत गेले आहेत.
मात्र, यावेळी त्यांच्या एकाही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याची रिस्क घेतली नाही. या सर्वांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली होती. त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी शेवटी सतीश चतुर्वेदी यांनाच पुढाकार घ्यावा लागला. त्यांच्या उपस्थिती सोमवारी देवडिया काँग्रेस भवनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पुन्हा पक्षात प्रवेश दिला. यावेळी आमदार अभिजित वंजारी हेसुद्धा उपस्थित होते. दीपक कापसे यांच्यासह माजी नगरसेवक नाना झोडे, शिवसेनेचे संघटक श्रीकांत कैकाडे, विभाग प्रमुख रमेश अंबर्ते, विभाग प्रमुख अंगद हिरोंदे, उपविभाग प्रमुख गोलू गुप्ता यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला आहे.
दीपक कापसे हे महापालिका स्थायी समितीचे सभापती आणि नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त होते. सलग निवडून येत असतानाही त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे मोठा असंतोष उफाळून आला होता. मुत्तेमवार-ठाकरे गटावर रोष व्यक्त करण्यात आला होता. यातून तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत अंडी आणि शाई फेकण्यात आली होती. हे कृत्य करणारे सर्वच चतुर्वेदी यांचे समर्थक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर चतुर्वेदी यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते.
मात्र, दोन वर्षाच्या आतच त्यांचे निलंबन बाळासाहेब थोरात यांनी मागे घेतले होते. वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा उबाठात असे चित्र त्यावेळी निर्माण झाले होते. कालांतराने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यामुळे सर्वांचा रोषही मावळला. मागील महापालिकेच्या निवडणुकीत अनेकांच्या तिकिटे कापल्याचा जबर फटका काँग्रेसला बसला होता. त्यांचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते. या रोषामुळे विद्यमान आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचाही पराभव झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.