
Nagpur, 21 January : विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपला आता नागपूर महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. यावेळी विक्रमी संख्येनी नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प भाजपने केला आहे. मात्र, उमेदवारी देताना काळजी घेण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्याकरिता माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जात आहे. याशिवाय निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांचा सर्वेसुद्धा करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया प्रदेश भाजपकडून केली जात आहे, त्यामुळे निष्क्रिय नगरसेवकांना भाजपकडून डच्चू मिळणार असल्याचे दिसते.
मागील निवडणुकीत भाजपचे तब्बल 108 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपने 150 पैकी 130 प्रभाग जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे तीन बडे नेते महापालिका निवडणुकीत भाजपच्या मदतीला असणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांचे मताधिक्य घटले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) चार उमेदवार निवडून आले. उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर मतदारसंघ भाजपला जिंकता आले नाही. मात्र, दोन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. असे असले तरी महापालिकेच्या निवडणुकीत हे मताधिक्य कायम राहील, असे चित्र नाही. नगरसेवकांचा थेट संपर्क नागरिकांशी येतो.
महापालिकेतील पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजप नगरसेवकांचा अनुभव नागरिकांना फारसा चांगला नाही. अनेकांविषयी अद्यापही नाराजी आहे. महिला नगरसेविकांच्या वतीने त्यांच्याच पतीने कारभार हाकला आहे. अनेक नगरसेवकांनी जिंकून आल्यानंतर प्रभागात फेरफटकासुद्धा मारलेला नाही. वेळेत निवडणूक झाल्या असत्या, तर भाजपला मोठा फटका बसला असता. मात्र, आता दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ निघून गेला आहे. सध्या महापालिकेवर प्रशासक आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांविषयी नाराजी थोडीफार दूर झाली आहे. मात्र पुन्हा तेच उमेदवार लादल्यास जनता त्यांना मते देतील याची काही खात्री देतात येत नाही.
विशेष म्हणजे महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने नगरसेवकांना आपले कार्यालय बंद ठेऊ नका, असे निर्देश दिले होते. जनतेचे प्रश्न आणि त्यांची कामे करीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांनी कार्यालये सुरू ठेवली आणि सक्रिय राहिले. त्यामुळे याचा सर्व लेखाजोखा महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना ठेवला जाणार आहे.
निवडून आल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी काम कामे केली, जनतेशी किती जनसंपर्क ठेवला, प्रभागात तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ते किती सक्रिय होते, याचा सर्व्हे केला जाणार आहे. याशिवाय महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेला कार्यकर्ता पक्षात किती सक्रिय आहे, याचीही चाचपणी सर्वेच्या माध्यमातून केली जाणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांना विचारणा करण्यात आली असता प्रदेश भाजपच्या वतीने सर्वे केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.