

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : महापालिकेत भाजपची शतप्रतिशत सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने आता कारभाराला वेग आला आहे. सत्ता हाती घेतल्यानतंर शहरातील आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णायानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. आठवडी बाजार हे या शहरांची ओळख आहे, शिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक चांगली सुविधा असल्यामुळे ते बंद करू नये, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर आठवडी बाजार बंद करून ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून ते सातत्याने बिल्डरधार्जीने धोरण राबवत आहेत, असा आरोप करत सोमवारी अंबादास दानवे यांनी शहरातील शहानुरमियाँ दर्गा भागातील आठवडी बाजारात जाऊन आंदोलन केले.
'चला चला, बाजाराला चला' असे आंदोलन करत भाजपच्या कारभारावर टीका केली. शहरात तीन आठवडी बाजार भरतात, यातून ग्रामीण भागातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणून व्यवसाय करतात. तर सामान्य नागरिकांनाही ताजा भाजीपाला एकाच ठिकाणी मिळतो. आठवडी बाजाराची परंपरा ही गेल्या 30-35 वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेने कुठे भाजी विक्रेत्यांना हाॅकर्स झोन करून दिलेले नाही, त्यामुळे त्यांना आठवडी बाजारातून आपला व्यवसाय करावा लागतो.
पण महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर हे आठवडी बाजार वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, असे खोटे सांगून ते बंद करण्याचा डाव आखण्यात आला आहे. पुढे ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे, आणि म्हणून चला चला बाजाराला चला, हे आमचे आंदोलन असल्याचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सांगितले. वाहतूकीला अडथळा हे बाहेर रस्त्यावर जे विक्रेते बसतात त्यांच्यामुळे होतो, त्यांना तिथून महापालिकेच्या पथकाने हटवले पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे.
ते न करता सरसकट शहरातील तीनही बाजार बंद करण्याचा निर्णय हा कोणाच्या हितासाठी घेतला जात आहे? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी भाजपावर ते बिल्डर धार्जीने धोरण राबवत असल्याची टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. हा सदर आठवडी बाजार बंद करून हा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जात आहे.
हा निर्णय गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजगारावर घाला घालणारा असून भाजपच्या (BJP) फायद्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे, याचा निषेध म्हणून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेने हे आंदोलन केले. दानवे यांनी आंदोलनात सहभाग घेत बाजारातून भाजी खरेदीही केली.