
Uddhav-Raj Thackeray: वीस वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झालेले शिवसेनेचे दोन वाघ पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे येत्या ५ जुलै रोजी 'वरळी डोम' या बहुद्देशीय सभागृहात आयोजित 'मराठी विजयी मेळाव्या'त एकत्र येणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी देखील सुरु आहे. विशेष म्हणजे यावेळी दोघांची भाषणरुपी तोफही धडाडणार आहे. यावेळी एकत्रितरित्या ते महाराष्ट्राला काय संबोधित करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण उद्धव-राज हे शेवटचे एकाच व्यासपीठावर कधी आणि कुठे आले होते? याचा सविस्तर वृत्तांत जाणून घेऊयात.
राज ठाकरे अजून शिवसेनेतून बाहेर पडले नव्हते, तेव्हा अर्थात सन २००५ मध्ये दोघे चुलत भाऊ शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर हे दोघेही वेगळ्या राजकीय दिशांना गेले, त्यानंतर ते कोणत्याही राजकीय मंचावर एकत्र आले नाहीत. अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवर कोरोनाच्या काळात एक शस्त्रक्रिया झाली तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना स्वतः कार चालवत रुग्णालयातून घरापर्यंत पोहोचवलं होतं. पण एकदाही राजकीय व्यासपीठावर दिसले नव्हते.
दरम्यान, या गेल्या वीस वर्षातच नव्हे तर गेल्या सहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्या. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात नवा राजकीय पर्याय उभा केला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि निवडणूक आयोगाकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं. आता शिंदेंची शिवसेनाच अधिकृत शिवसेना म्हणून गणली जात आहे. तर दुसरीकडं राज ठाकरे हे गेल्या दहा वर्षांपासून पक्षांतर्गत विविध रणनीती राबवत आहेत. पण त्यांना यश मिळताना दिसत नाही.
आता तर मुंबईसह राज्यातील इतर अनेक महपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण ते एकत्र येणार असले तरी दोन पक्षांची युती या स्वरुपात एकत्र येऊ शकतात. पण याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत बैठक किंवा चर्चा झालेली नाही. पण ज्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा जन्म झाला त्या मराठी भाषेच्या मुद्द्यानंचं अखेर या दोघा भावांना पुन्हा एकत्र आणलं आहे.
सन २००० मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवसेनेत घोडदौड सुरु होती. यामध्ये उद्धव ठाकरे हे संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागे शांत होते. तर राज ठाकरे हे थेट जनतेसमोर येऊन भाषणं आणि शिवसेनेचे कडवी भूमिका मांडत होते. त्यामुळं सहाजिकच राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार असतील असं बोललं जात होतं. पण २००३ मध्ये अचानक एक ट्विस्ट आला.
या वर्षात महाबळेश्वराला शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांनी अचानक उद्धव ठाकरेंना शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं. आता कार्यकारी अध्यक्ष म्हणजे भविष्यात हीच व्यक्ती पक्षाची प्रमुख असेल असं मानलं जातं. त्यामुळं बाळासाहेबांच्या या घोषणेनंतर शिवसेनेत आणि सामान्य शिवसैनिकांमध्ये भूकंप झाला.
यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे समर्थक हे शिवसेनेत बाजुला ढकलले गेले. हा राजकीय ताण वाढतच गेला, त्यानंतर अखेर दोन वर्षांनी २६ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यावेळी त्यांनी एक भावनिक भाषणंही केलं, यामध्ये त्यांनी म्हटलं की, मी अत्यंत आदरानं सगळ्या गोष्टी केल्या पण मला जे मिळालं ते अत्यंत अपमानास्पद आणि छळणारं आहे. माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्याभोवतीच्या बडव्यांशी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.