

Mumbai News: आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठी-अमराठी हा वाद पेटण्याची शक्यता आहे. हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात दंड थोपटत आपले सुमारे 20 वर्षांचे राजकीय हाडवैर विसरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UddhavThackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले. ठाकरे बंधूंनी शिवसेना-मनसे युतीचे संकेत देत मुंबई महापालिकेसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण याचदरम्यान,आता मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांच्या एका वक्तव्यानं आता मुंबई-बॉम्बे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूकच ठाकरे बंधू मराठी -अमराठीच्या मुद्द्यावर फिरवण्याची शक्यता असतानाच आता केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबई येत वादग्रस्त विधान करत खळबळ उडवली आहे. सिंह यांनी आयआयटीच्या एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले, त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना असल्याचं सांगितलं. सिंह यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात झाली आहे. मनसेनं मंत्र्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजपसह (BJP) महायुतीलाही घेरलं आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,आय.आय.टी. बॉम्बेचे “आय.आय.टी. मुंबई” केले नाही याबद्दल मी आभार मानतो, असे निर्लज्ज आणि बेशरम विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबईत येऊन करतात.
मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आणि हिनवण्याची एकही संधी भाजप आणि भाजपचे नेते सोडत नाही. या भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या बिळात लपले आहात असा खोचक सवालही काळे यांनी केला आहे.
तसेच आपले केंद्रीय नेते, भाजपचे जितेंद्र सिंह यांचा जाहीर निषेध करण्याची हिंमत आहे का मुंबईतील भाजपा नेत्यांमध्ये? असा संतप्त सवाल करत पुढच्यावेळी जितेंद्र सिंह मुंबईत येतील, त्यावेळी त्यांचा मनसे सत्कार करू, असा इशारा काळे यांनी दिला.याचवेळी त्यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांना वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळ, पश्चात्ताप करा आणि नाक घासून माफी मागा मराठी माणसाची असंही म्हटलं आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या धर्तीवर सर्वच पक्षांमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागल्यानं सर्वच पक्षाच्या नेते,कार्यकर्ते यांच्यात प्रचंड जोश पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजप, शिंदे सेना, ठाकरेंची शिवसेना, मनसे व काँग्रेसमध्ये मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्याचमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनच शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना या निवडणुकीत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठे कार्ड खेळत आहे. त्यानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेतून पळवलेल्या माजी नगरसेवकांच्या विरोधात आता मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याने ठाकरे बंधूंची ही चाल शिंदे सेनेवर भारी पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.