
Mumbai, 03 December : महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या रुसवा-फुगव्याचे रुपांतर विसंवादात झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांतील विसंवाद वाढल्याचे शिवसेना आमदार उदय सामंत यांच्या ताज्या विधानावरून दिसून येत आहे. गेली दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींवरूनही या दोन मित्रपक्षांमध्ये वाद असल्याचा संशय बळावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने (Mahayuti) विधानसभेची निवडणूक लढविली, त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून लावून धरण्यात आली होती. मात्र, सुमारे 132 जागा जिंकणाऱ्या भाजपने मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडला नाही, त्यामुळे शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील आपल्या मूळगावी काही दिवस आले होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडताना एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, गृहमंत्रिपदही देण्यास भाजपने नकार दिला आहे, त्यामुळे शिंदेंसह शिवसेना (Shivsena) नेतेही भाजपवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजपने महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा येत्या पाच डिसेंबर रोजी मुंबईत शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या तारखेची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या घोषणेबाबतच शिवसेनेचे आमदार, माजी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्चर्यकारक विधान केले आहे. महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच तारखेला होणार आहे, हे आम्हाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमुळे समजले आहे, अशी खंत सामंत यांनी बोलून दाखवली.
सामंत म्हणाले की, नव्या मुख्यमंत्र्यांचा पाच तारखेला शपथविधी सोहळा आहे, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमुळे आम्हाला समजले. शपथविधीला अजून 48 तासांचा अवधी आहे. या 48 तासांत अनेक घडामोडी घडू शकतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे जो प्रस्ताव ठेवला होता. त्यासंदर्भात शहा हे स्वतः शिंदे यांच्याशी चर्चा करणार होते. त्या दोघांत चर्चा झाली की नाही, हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे कोणालाच अंदाज लागत नाही. योग्य तो सन्मानपूर्वक निर्णय होईल, याची आम्हाला खात्री आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यात उदय सामंतांच्या विधानाने दोन पक्षातील वादासंबंधीचा संशय बळावला आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांनी केली. या भाजप नेत्यांसोबत ना राष्ट्रवादीचे नेते होते ना शिवसेनेचे. त्यानंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.