Sharad Pawar attack on Central Government : देशात दररोज काहीतरी वेगळे घडत आहे. जातीय दंगलीतील सर्व दोषींना निर्दोष सोडले जाते. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते. त्यांचे खटले वर्षानुवर्षे न्यायालयात नेले जात नाहीत. देशात आम्ही म्हणेल तसेच घडले पाहिजे, विरोध केला तर कारवाई केली जाते, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर साधला आहे.
देशातील एकेखोर प्रवृत्तीविरोधात आता लढावे लागणार आहे. सध्याचा काळ संघर्षाचा असून जागे राहावे लागेल. त्यासाठी किंमत मोजावी लागेल. कुणावर अन्याय झाला तर त्याच्यामागे ताकदीने उभे राहावे लागेल, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
शरद पवार यांनी देशात सध्या सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची टीका केली. पवार म्हणाले, "गुजरामधील (Gujrat) जातीय दंगलीतील अटकेतील सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. वर्षानुवर्षे केस चालली. आता सर्वांना निर्दोष सोडले. आता ती हत्या कशाने झाली? कुणी हल्ला केला नाही तर हत्या कशी झाली? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे ज्यांची हत्या झाली ते गेले आणि दुसरीकडे सत्तेचा गैरवापर करून कायद्याचीही हत्या करण्यात आली आहे."
सरकारच्या धोरणामुळे सध्या 'ईडी'च्या (ED) कारवाईची चेष्टा होतेय. 'सीबीआय' सर्वांना माहिती झाल्याचेही पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "ईडी, 'सीबीआय' या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सुरुवातीला १०० कोटींचा आरोप करून ईडीची चौकशी केली. त्यांना १३ महिने तुरुगांत ठेले. आता तपासानंतर एका शिक्षण संस्थेला मिळालेल्या एक कोटी देणगीचा मुद्दा पुढे आणला. माजी मंत्री नवाब मलिकांना दीड वर्षे तुरुंगात ठेवले आहे. आता १५ दिवसांनी सुनावणीची तारीख पुढे ढकलल्याची बातमी येते. खासदार संजय राऊतांनाही काही महिने तुरुंगात ठेवले. माजी मंत्री एकनाथ खडसेंवरही कारवाई झाली. खडसेंच्या जावायांनाही दोन वर्षांपासून तुरुंगात ठेवले आहे. त्यांची केस न्यायालयात जात नाही. सत्तेचा गैरवापर यापेक्षा काय असू शकतो?"
लोकशाहीमध्ये ठाम भूमिका घेणाऱ्यांना आता डांबून ठेवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "विरोधात जातील त्यांच्यावरोधात सत्तेचा गैरवापर करून कारवाई केली जात आहे. आम्ही म्हणले तसा देश चालला पाहिजे, अशी भूमिका सध्याच्या सरकारची आहे. त्यामुळे काळ संघर्षांचा बनला आहे. जागे राहावे लागेल. काहीही झाले तरी किंमत मोजावी लागेल. कुणावर अन्याय झाला तर त्याच्या मागे ताकदीने उभे राहिले पाहिजे. या प्रवृत्तीच्या विरोधात लढावे लागेल."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.