
Mumbai News, 02 Feb : "एकनाथ शिंदे (Eknath Shidne) व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असे शिंदेंना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे"; अशी माहिती आपणाला शिंदेंच्याच आमदाराने दिल्याचा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्या मुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती.
आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही, असंही राऊत यांनी सामनातील 'रोखठोक' या सदरात म्हटलं आहे. राऊतांनी लिहिलं की, आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंधच राहिलेले नाहीत याची प्रचिती देणारे प्रसंग रोज घडत आहेत. त्यामुळे जनतेचे मनोरंजन सुरू आहे.
त्यात भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या ठाण्यात नियमित जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केल्यामुळे नवी वादाची ठिणगी पडली आहे. यावर शिंदेंच्या लोकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकार किती बेचव आणि अळणी आहे व आपापसातील मारामाऱ्यांमुळे प्रशासन व जनतेचे किती हाल होत आहेत त्याची फिकीर कुणालाच नाही. शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही एक माहिती देऊन गोंधळ वाढवला, असा मोठा दावा राऊतांनी (Sanjay Ruat) केला.
शिंदेंच्या आमदाराने सांगितलं की, शिंदे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. ते मनाने कोलमडले आहेत.
निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाल्याचं शिंदेंना वाट आहे, असं त्या आमदाराने आपणाला सांगितल्याचा दावा राऊतांनी केला.
शिवाय एकनाथ शिंदेंचे फोन टॅप केले जात असल्याचा संशय देखील शिंदेंना असल्याचं या आमदाराने सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातले राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे दर्शविणारी ही हवेतली चर्चा आहे. शेवटी काय, तर भाजप कोणाचाच नाही, असं म्हणत राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांच्या आता या दाव्यावर शिंदे गट आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.