

Nilesh Chandra: हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतले कबुतरखाने हटवण्याची मोहिम मुंबई महापालिकेनं सुरु केल्यानंतर त्यावरुन धार्मिकवाद घालणारे तसंच मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरुन 'महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही' अशी भाषा वापरणारे जैन मुनी निलेशचंद्र हे आता भानावर आले आहेत. "महाराष्ट्राच्या भूमीवर तुम्हाला राहायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला करावाच लागेल", असं ताज विधान त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर कबुतरांचा वाद, मांसाहारी-शाकाहारी आणि मराठी-हिंदी या वादावर त्यांनी भाष्य केलं, पण यासाठी राजकीय नेत्यांनाच त्यांनी जबाबदार धरलं आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठीतून आपली भूमिका मांडली. म्हणाले, "या नेते मंडळींनी निवडणुका आल्या की, कबूतर, मांसाहारी-शाकाहारी हे वाद आणले. याआधी त्यांनी मराठी आणि हिंदीचा वाद आणला पण तो चालला नाही म्हणून मग त्यांनी परत कबूतराचा वाद निर्माण केला. परंतू या महाराष्ट्राच्या भूमीवर रहायाचं असेल तर तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान करावा लागेल. हिंदू आणि हिंदी हे दोन वेगळे मुद्दे आहेत. आमचा जो वाद आहे तो नेते मंडळींनी काढलेला आहे"
दरम्यान, जैन मुनी निलेशचंद्र यांनी यापूर्वी बोलताना अनेकदा वादग्रस्त विधान केली आहेत. मराठी-हिंदीच्या वादावर बोलताना त्यांनी शिवसेना आणि मनसेला इशारा देताना म्हटलं होतं की, भाषेच्या नावावर मारवाडी किंवा गैरमराठी लोकांना हात जरी लावला तरी त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. पुढे बोलताना महाराष्ट्र हा कोणाच्या बापाचा नाही, तसंच हल्ले करणाऱ्यांना उत्तर दिलं जाईल अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली होती. तसंच मुंबईतील राजस्थानी, जैन आणि मारवाडी समुदयाला एकजूट होण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. तसंच मीरा-भायंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि माजी आमदार गीता जैन यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. तसंच त्यांच्या नेतृत्वावर आणि हिंदुत्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
धार्मिक व्यक्ती असतानाही मुनी निलेशचंद्र यांच्या या राजकीय विधानावर मनसे आणि मराठी एकीकरण समितीनं त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मनसेचे शहरअध्यक्ष संदीप राणे यांनी निलेशचंद्र यांच्या राजकीय आखाड्यात उतरण्यावर टीका केली होती. तसंच मराठीपणाची ओळख आणि संरक्षणावर भर दिला होता. तर दुसरीकडं मराठी एकीकरण समितीनं देखील निलेशचंद्र यांना आव्हान देताना महाऱाष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी बोलता यायलाच हवी आणि जर कोणी अहंकार दाखवतच असेल तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल असा इशाराही दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.