Mumbai News, 21 Dec : कल्याण (Kalyan) येथील योगीधाम परिसरातील अजमेरा हायइट्स या सोसायटीतील रहिवासी असलेल्या आणि अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या परप्रांतीय व्यक्तीने काही गुंडांना बोलावून अभिजीत देशमुख या मराठी रहिवाशाला गंभीर मारहाण केली. या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापलं असून याचे पडसाद शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात उमटल्याचंही पाहायला मिळालं.
या प्रकरणात मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, राज्यात महायुती सरकार आल्यानंतरच या उपऱ्या लोकांची मराठी माणसांवर हल्ला करण्याचं धाडस वाढलं आहे. कारण मराठीद्वेष्टय़ांना आता महाराष्ट्रात आपलं सरकार आल्याचं वाटत आहे. त्यामुळे मराठी माणसाला तुडवले तरी आपले कोण काय वाकडे करणार?
या मस्तीत परप्रांतीय आहेत असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'मधून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना पाशवी बहुमत मिळाले. त्यातून स्थापन झालेले सरकार हे नपुंसक आहे. बहुमत आहे, पण ते बहुमत खरे नाही. तसे नसते तर मुंबईत मराठी माणसांवर निर्घृण हल्ले झाले नसते.
मराठीद्वेष्टय़ांना वाटते, महाराष्ट्रात आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे मराठी माणसाला लाथाडले, तुडवले तरी आपले कोण काय वाकडे करणार? या मस्तीत ते आहेत. कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या उपऱ्याने गुंड टोळ्यांच्या मदतीने मराठी कुटुंबावर हल्ला केला. मराठी माणसं मच्छी-मटण खातात, ती घाणेरडी आहेत या सबबीखाली शुक्ला व त्याचे गुंड झुंडशाही करतात आणि फडणवीसांचे पोलिस त्यांच्यासमोर नांगी टाकतात.
हा शुक्ला आहे महाराष्ट्राच्या मंत्रालयात काम करतो व मंत्रालयाचा अधिकार वापरून पोलिसांवर दबाव आणतो. त्यामुळे रक्तबंबाळ मराठी कुटुंबाची फिर्याद घ्यायला फडणवीसांचे (Devendra Fadnavis) पोलिस तयार नाहीत. तर, 'मला हात लावाल तर याद राखा, मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल’, अशी धमकी हा शुक्ला देतो. म्हणजे मराठी माणसांवरील हल्ल्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
तर मराठी माणूस माझ्यासमोर झाडू मारतात, अशी गुर्मीची मस्तवाल भाषा करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. त्याला मोदी-शहा-फडणवीस यांचे महाराष्ट्र कमजोर करण्याचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीच या त्रिकुटाने शिवसेना फोडली, असा गंभीर आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
तर मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची (Shivsena) स्थापना झाली व मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शिवसेना लढे देत राहिली. त्यामुळे मुंबई व मराठी माणूस टिकून राहिला, पण मोदी-शहांना मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे आणि शिवसेना आहे तोपर्यंत हा डाव यशस्वी होणार नाही, म्हणूनच शिवसेना तोडण्याचे कारस्थान तडीस नेले.
त्यामुळे मुंबईतील सर्व संपत्ती आता अदानी व इतर उपऱ्यांना सहज हडप करता येईल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. दरम्यान, कल्याणमधील घटनेवरून उमटलेले तीव्र पडसाद व संतापाचा उद्रेक पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषिक कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्ला या एमटीडीसीच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा केली.
शिवाय अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला असला तरी हे सरकार सत्तेवर आल्यापासूनच या माजोरड्या उपऱ्यांची मराठी भाषकांवर हल्ले करण्याची हिंमत कशी काय वाढली, हा प्रश्न उरतोच. आज मुंबई, ठाण्यात, पुण्यात, नाशिकात मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. उद्या संपूर्ण महाराष्ट्र कमजोर करून मोदी-शहा-फडणवीसांचा दास बनून पायाशी पडेल.
शिवसेना तोडून सत्तेसाठी सरकारसोबत गेलेले मिंधे पेढे वाटण्यासाठी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत. कल्याणचा हा शुक्ला कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? फडणवीस आणि शिंदेंनी याचा खुलासा करावा, सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे हे लक्षात ठेवा.
शुक्ला मंत्रालयातला नोकर असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा, की त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल? असा सवाल करतच राऊतांनी पेढे वाटा खरंच महाराष्ट्र कमजोर होतोय असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकाही केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.