
Mumbai News, 07 Aug : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णायावरून ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक आयोगासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे सांगतात की, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्र होणार नाहीत. त्या टप्प्याटप्प्याने होतील. कोणत्या निवडणुका आधी किंवा नंतर होतील ते नक्की नाही.
शिवाय निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष बटण दाबलेले मत नक्की कोणाला गेले हे समजण्याची व्यवस्था नाही. मतदार यादीतही बदल होणार नाही, अशी माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी दिली. निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होईल, पण मतदाराने कोणाला मतदान केले हे चिठ्ठी स्वरूपात दर्शविणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होणार नाही. हे संशयास्पद आहे.
निवडणूक आयोग म्हणतोय की, व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागत असल्याने त्याचा वापर होणार नाही. निवडणूक प्रक्रियेस वेळ लागू नये म्हणून भाजप ईव्हीएमचा आग्रह धरतो. ईव्हीएम म्हणजे जगातल्या लोकशाहीतला सर्वात मोठा फ्रॉड आहे. तरीही त्यांचा वापर भारतात चालतो. ईव्हीएम पारदर्शक आहे आणि वेळ वाचतो असे भारताच्या निवडणूक आयोगाचे व त्याच्या राजकीय बापांचे म्हणणे आहे.
मग ईव्हीएमशी संबंधित व्हीव्हीपॅट यंत्रणा दूर का ठेवता? असा सवाल करत ही फसवाफसवी असल्याचा आरोपही सामनातून केला आहे. तसंच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागत असेल तर मतदान पत्रिकेवर निवडणुका घेणे हाच एकमेव पर्याय आहे. लोकशाही रक्षणासाठी ते आवश्यक आहे.
हायकोर्टाच्या न्यायासनावर आपल्याच प्रवक्त्यांना बसवणारा मोदी-शहांचा भाजप निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो याविषयी जनतेच्या मनात शंका नाही. राज्याचा निवडणूक आयोग म्हणतोय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून 25 हजार मतदान यंत्रे आणली जातील.
इथेच शंकेची पाल चुकचुकते. कारण मध्य प्रदेशात भाजप जिंकण्याची शक्यता नव्हती, पण निकाल धक्कादायक लागले. ईव्हीएममध्ये घोटाळा केला असे राहुल गांधींपासून सगळ्यांचे ठाम मत आहे. महाराष्ट्रात नेमकी तीच वापरलेली ‘ईव्हीएम’ आणली जात आहे. ही बाब गंभीर असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.