
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत विराजमान झालं आहे.पण प्रचंड बहुमताचं दान पदरात टाकूनही महायुतीत खातेवाटप,मंत्रिपदं,पालकमंत्रिपदं यावरुन नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं. सत्तेत परतून आता जवळपास तीन महिने उलटले असले तरी नाराजी,कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यात शिंदेंनी ठाकरेंना जोरदार धक्का देत 81 पैकी 57 जागा जिंकल्या. यानंतर शिंदेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करताना ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या बेधडक विधानं,खळबळ उडवून देणार्या दाव्यांसाठी ओळखले जातात.आता त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेना भाजपात विलीन होणार किंवा कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वाखाली एक मोठा आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये दाखल होणार असल्याची खळबळजनक विधान केलं आहे.आधीच एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना जोर आलेला असतानाच आता राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
राऊत म्हणाले, भाजप व एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाही.शिंदेंचं काम झालेलं आहे. आता त्यांचं काम तमाम होणार आहे,हे आता सर्वांना दिसत आहे. हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्या लोकांनाही माहिती आहे,असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.शिंदे गट हा लवकरच भाजपात विलीन होईल असंही राऊत यांनी सांगितले.
तसेच एक गोष्ट तुम्हांला स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या की,विधानसभेच्या 2029 च्या निवडणुकीत चित्र पूर्ण बदललेले असेल. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही असाही दिवस असेल. त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल, असा दावा राऊतांनी करत राजकारण तापवलं आहे.
राऊत म्हणाले,सत्ता,पैसा यांचा दबाव आहे. पण आम्ही खचणारे लोक नाहीत.जे जात आहेत, त्यांना जाऊ द्या. काहीतरी अडचणी आहेत. जुन्या केसेस काढल्या जात असून काही लोकांची मनं कमकुवत झाली आहेत. लढण्याची इच्छाशक्ती नसलेले लोकच जात आहेत.मुर्दाड लोकांना ठेवून तर काय करायचं असा हल्लाबोलही राऊतांनी यावेळी केला.
याचदरम्यान, त्यांनी जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत,असंही दावा केला आहे. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पुढच्या दोन दिवसांत एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यात आम्ही काही जणांना नव्यानं जबाबदाऱ्या देणार असल्याची भूमिकाही राऊतांनी यावेळी स्पष्ट केली.
सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं एका कुणाला वाचा फुटले आणि खरे आरोपी 'आका' चा 'आका' हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले आम्ही आणले नाही. बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही.धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली, बीडमध्ये वातावरण निर्मिती केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला. बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे, हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावे,असंही शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.