
Mumbai News : गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतासह महायुती सरकार सत्तेत आलं होतं. तेव्हापासून सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांची वादग्रस्त विधानं, हाणामारी, आक्षेपार्ह टीकाटिप्पणी यामुळे महायुतीची मोठ्या प्रमाणात नाचक्की होताना दिसून येत आहे.
यातच पावसाळी अधिवेशनात संजय गायकवाड यांची कँटिन कंत्राटदारांना मारहाण, पडळकर विरुद्ध आव्हाड वाद, कृषिमंत्री कोकाटेंचा सभागृहातच रमी खेळतानाचा व्हिडिओ या अनेक प्रकरणांमुळे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. याचदरम्यान, महायुतीच्या (Mahayuti ) गोटातून आता एक सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी आता गुरुवारी (ता.24) मंत्रिमंडळात मोठे फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्यांनी राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे मोठं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता, त्यानुसार मंत्र्यांच्या कामाचं ॲाडिट झालं आहे. त्या ऑडिटमध्ये कोण मंत्री कसं काम करतो, काय करतो याचं ॲाडिट पूर्ण झालं आहे.
त्यानुसार ॲाडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांमध्ये बदल होणार असल्याचे सूतोवाच धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत. त्यांनी येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळात नवीन चेहरे दिसणार असून खांदेपालट होईल. काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या त्यांच्या विधानाला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांची पार्श्वभूमीवर आहे.
पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस जितेंद्र आव्हाड यांच्यातही जुंपली होती. एकमेकांवर खालच्या भाषेत टीका करताना धमकावणं आणि हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोहचलं होतं. यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही दोन्ही नेत्यांना तंबी दिली होती.
यावरही भाष्य करताना आत्राम म्हणाले, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात बदल होईल, असं वातावरण सध्या दिसत आहे. मंत्रिमंडळात काही बदल होतील, कारण एनर्जी असलेले मंत्री हवे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना परफॉर्मन्स हवा असल्याचंही आत्राम यांनी सांगितलं.
आत्राम म्हणाले, मंत्री असताना जबाबदारी असते, कोड ॲाफ कंडक्ट असतात. तसं वागायला हवं. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं आहे. याचदरम्यान, त्यांनी कोकाटेंच्या तुलनेत तरुण नेता, माझ्या कार्यशैलीनुसार माझं वय 30-35 आहे. नवीन मंत्री असताना काही शिकायचं असतं,असं त्यांनी कोकाटे डिवचलं.
आपण पाचवेळा आमदार राहिलो, मंत्री राहिलो, चांगल्या शाळेत शिकलो. आम्हाला माहित आहे. कसं वागायचं. मानसन्मान कसा ठेवायचा, आम्हाला माहित आहे. मंत्री असताना जबाबदारी असते, कोड ॲाफ कंडक्ट असतात. तसं प्रत्येकानं वागायला हवं असा सल्लाही आत्राम यांनी कोकाटेंना दिला.
स्थानिक स्वराज संस्थेच्या आधीच महायुती आपल्या पदाधिकारी आणि आमदारांना मोठं गिफ्ट देणार आहे. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपासून रखडलेला महामंडळ जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याची माहिती आहे. महामंडळच्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 44 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 33 तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 जागा मिळणार आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी हुकलेल्या आमदारांची नाराजी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन दूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.