Mumbai News, 15 Jul : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई यांनी आज विधानसभेत मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडल्या संदर्भातील लक्षवेधी मांडली.
त्यावर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालण्यासाठी मुंबईतल्या आमदारांना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीला बोलवावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य आणि सरदेसाई यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई बोलायला उभे राहिले.
ते म्हणाले, राम कदम, वरूण सरदेसाई आणि आदित्यसाहेबांनी जी मागणी केली. त्याबाबतचं लेखी पत्र दिलं तर मी मुख्यमंत्र्यांना सांगेन की सगळ्यांना बोलवू कारण यासाठी केंद्राची ना हरकत मिळाली पाहिजे आणि झोपडपट्टी पुनर्वसन झालं पाहिजे.
मात्र, या प्रश्नावर आमदार सरदेसाई यांचं समाधान झालं नाही. ते म्हणाले की, "कदाचित केंद्राकडे टॉप प्रायोरीटीने विचार केला जाईल एवढंच छापील ब्रीफिंग मंत्र्यांना झालं असेल. किती दिवस सचिव सचिव पत्र खेळत बसणार. 2017 सालापासून लक्षवेधी लागली तेच उत्तर दिलं जात आहे. त्यामुळे किती कालावधीत आम्हाला जमिनीचं हस्तातरण केलं जाईल याचं ठोस उत्तर द्या."
मात्र, वरूण सरदेसाईंच्या छापील ब्रीफिंग मंत्र्यांना झालं असेल या वक्तव्यावर शंभूराज देसाई चांगलंच भडकले. ते म्हणाले, "मला या विषयात अधिक खोलात जायचं नव्हतं पण आता माझ्याकडे अपूर्ण ब्रीफिंग आहे. एवढंच ब्रीफिंग झालं असेल असं म्हटलं जात आहे.
तर ऐका मला नम्रपणे सांगायचे आहे की 2019 ते 2022 या वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही"; शंभूराजे देसाई यांनी असं म्हणताच विधानसभेत ठाकरे गटाने मोठा गोंधळ घातला. त्यावर पुन्हा "2019 ते 2022 मध्ये तुम्ही काय केलं सांगाना एकही पत्र दिलं नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही.
2022 शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही चारदा पत्र दिलं तुम्ही काय केलं?", असा सवाल शंभूरा देसाईंनी करताच. ठाकरे गट आक्रमक झाला आणि 'तुम्हाला असं बोलताना लाज वाटत नाही का?' असं म्हटलं. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, "आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं सांगा."
त्यावर भास्कर जाधव यांनी मध्यस्ती करत सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर शंभूराज देसाई यांच्या मदतीसाठी गुलाबराव पाटील धावून आले आणि त्यांनी वरूण सरदेसाई यांना सुनावलं. "जर मंत्री महोदय उत्तर देत होते तर त्यांनी बाकीच बोलण्याची गरज नव्हती. शंका असेल तर उत्तर दिली जातील, लाज काढायचा अधिकार यांना कोणी दिला. हे काहीही बोलणार का? तुझ्यापेक्षा जास्त मला बोलता येत, जास्त बोलायचं नाही"; असं पाटील म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. चुकीची उत्तरं देत आहेत म्हणून हक्कभंग आणायचा का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, कोणत्याही मंत्र्याला खात्याबाबत बोलता येत नाही.
सभागृहाच्या नियमानुसार एखाद्या खात्यावर इतर मंत्र्यांना बोलायचं असेल तर अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. शंभुराज देसाई नगरविकास खात्याच्या प्रश्नांवर कसे बोलू शकतात. ते मुख्यमंत्री आहेत का? त्यांनी अध्यक्षांना पत्र दिलं होतं का?, त्यांच्या या प्रश्नानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्यामुळे विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.