

बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागांवर उमेदवार उभे केले, पण सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून पक्षाला १% पेक्षा कमी मते मिळाली.
अजित पवार यांनी सांगितले की त्यांनी बिहारमध्ये उमेदवार न उभे करण्याचा सल्ला दिला होता, पण वरिष्ठ नेत्यांनी (प्रफुल्ल पटेल आदी) स्वतंत्रपणे निर्णय घेतला.
बिहारमधील या पराभवाचा राष्ट्रीय दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होणार असून पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Mumbai, 15 November : भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभेची निवडणूक लढवली होती. बिहारमध्ये पंधरा जागा लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचवता आलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिहार विधानसभा लढविण्याच्या निर्णयाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच अंधारात ठेवण्यात आले होते की काय अशी चर्चा सध्या त्यांच्याच वक्त्यावर होताना दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नका, असे मी सांगितले होते. पण, वरिष्ठ पातळीवरून पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल वगैरे यांनी काही निर्णय घेतले, त्यानंतर त्यांनीच उमेदवार उभे केले. कारण मी महाराष्ट्रात जास्त लक्ष घातले होते, बिहार निवडणुकीत मी फार लक्ष दिले नव्हते. त्यामुळे बिहार निवडणुकीबाबत मला जास्त माहिती नव्हती.
दरम्यान, भाजप, जयदू आणि लोकजनशक्ती पक्ष असलेल्या एनडीएने बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे. या निकालाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणातही जाणवू लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मोठा फटका बसला आहे.
‘एनसीपी’ला बिहारमध्ये एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार यांनी बिहारमध्ये १५ उमेदवार उतरवले होते. या सर्व उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आलेला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याची निर्णयाची चर्चा आहे.
नौटन मतदारसंघातील जयप्रकाश यांना १८६ मते, मनिहारी मतदारसंघातून सैफ अली खान यांना २०५७ मते, पारसा मतदारसंघातून बिपिन सिंह यांना ४३५ मते, महुआ मतदारसंघातून अखिलेश ठाकुर यांना ६४३ मते, राघोपुर मतदारसंघातून अनिल सिंह यांना ६०२ मते, सासाराममध्ये तर उमेदवाराला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत. सासाराम विधानसभा मतदारसंघात एनसीपीचे उमेदवार आशुतोष सिंह यांना २१२ मते मिळाली; तर ‘नोटा’ ला ३६९ मते मिळाली आहेत.
1) बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती यश मिळाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १५ उमेदवार आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत.
2) उमेदवार उभे करण्याबाबत अजित पवारांचा काय दावा आहे?
अजित पवार म्हणतात, त्यांनी उमेदवार न उभे करण्याचा सल्ला दिला होता.
3) उमेदवारीचा निर्णय कोणी घेतला?
पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि इतर वरिष्ठांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.
4) कोणत्या मतदारसंघात नोटाला उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली?
सासाराम मतदारसंघात एनसीपी उमेदवाराला २१२ तर NOTA ला ३६९ मते मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.