
Mumbai News : मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा बांधवांसह मुंबई गाठलेल्या आंदोलक मनोज जरांगेंच्या पदरात अखेर मोठं यश मिळालं. राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या मोठ्या मागण्या मान्य करतानाच मराठवाड्यातील मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा जीआरही काढला आहे. यानंतर मराठा समाजाचं जल्लोष सुरू असतानाच सरकारच्या निर्णयावर आक्षेप आणि टीकात्मक पडसाद उमटू लागले आहेत.
वंचितच्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी गुरुवारी (ता.4 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपसमितीची, मनोज जरांगे, मराठा आंदोलक,संदीप शिंदे यांच्या समितीची फसवणूक झाली असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे महायुती सरकारच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून दुसरीकडे सरकारनं मनोज जरांगे पाटलांची फसवणूक केल्याचा आरोपाला आणखी धार चढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांचे (Manoj Jarange Patil) कट्टर समर्थक वकील योगेश केदार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार,वकील असीम सरोदे यांच्यानंतर आता आंबेडकरांनीही गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. यात भर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही गंभीर आरोप केले आहेत. यावेळी आंबेडकरांनी मराठा समाजाला फसवण्यात आल्याचा खळबळजनक दावाही केला आहे.
वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर रोखठोक भाष्य केलं. त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षानं जीआरमार्फत घेतलेला निर्णय फसवणारा असल्याचा आरोप आरोप आंबेडकर यांनी केला आहे.यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देतानाच सर्वच मराठा कुणबी आहेत असं सरसकट ग्राह्य धरता येणार नसल्याची आठवणही करुन दिली.
सरकारी निर्णयाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपसमिती,निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती, जरांगे पाटील यांच्यासह आंदोलनाला बसलेल्या मराठा कार्यकर्त्यांनाही फसवण्यात आल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं जो 2023 ला निर्णय दिला होता,त्या निर्णयाच्या पॅराग्राफ 13 मध्ये जे नमूद केलंय ते वाचून दाखवताना या निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधता येत नसल्याचं म्हटलं. याचवेळी न्यायालयानं पुढं कुणबी ही जात नसून व्यवसाय असल्याचंही सांगितलं.
राज्य सरकारने जो GR काढला, तो फसवणारा आहे. हा जीआर बेकायदेशीर असून कायद्याच्या विरोधात आहे. मराठा समाज जो आनंद व्यक्त करत आहे. तो क्षणिक असल्याचं मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मराठा समाजानं आरक्षणाची महत्त्वाची लढाई जिंकली! यांचे संपूर्ण श्रेय मनोजदादा जरांगे पाटील यांना तसेच त्यांना साथ देणाऱ्या गोर गरीब जनतेला जाते. एक सामान्य माणूस अख्खा व्यवस्थेला पुरून उरत, व्यवस्थेला झुकवून टाकतो. सरकारचे कट कारस्थान हाणून पाडतो. आता फक्त सरकारने प्रमाणपत्र वाटप करण्यात अडचण आणून फसवणूक करू नये ही माफक अपेक्षा. आणि शेवटचं मराठा आरक्षणाचं सर्व श्रेय हे जरांगे पाटलांच आणि त्यांच्या पाठीमागं राहणाऱ्या समाजाचे असल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.