

Thane News: राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. यात सर्वात जास्त चर्चा मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधील निकालाची होत आहे. याठिकाणी एमआयएमच्या तिकीटावर निवडणूक लढवत जिंकलेल्या नगरसेविका सहर शेख या सध्या सोशल मीडियावर मोठ्या वादात सापडल्या आहेत. त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्यानंतर एमआयएमच्या तरुण महिला नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचं नाव न घेता कैसा हराया? असं म्हणत डिवचलं होतं. तसेच त्यांनी पुढच्या पाच वर्षांनी संपूर्ण मुंब्रा हिरवं करुन टाकण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष राहिलेल्या युनूस शेख यांनी आपली मुलगी सहर शेखसाठी उमेदवारा मागितली होती. पण जितेंद्र आव्हाडांशी उडालेल्या खटक्यानंतर त्यांच्या मुलीसाठीची उमेदवारी नाकारण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर युनुस शेख यांच्या मुलीनं अर्थात सहर शेखनं Sahar Shaikh एमआयएमकडून निवडणूक लढली आणि ती जिंकलीही. याच विजयी सभेत बोलताना सहर शेख यांनी विरोधकांसह राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनाही ललकारलं होतं.
याचसभेत सहर शेख यांनी मुंब्र्याला हिरवं करणार असल्याबाबत गंभीर विधान केलं होत. त्यांच्या याच विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुंब्रा पोलिसांनी या विधानाची गंभीर दखल घेतानाच सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांना समाजात असंतोष निर्माण होईल,असं भाषण न करण्याबाबत तंबी दिली आहे.
मुंब्रा पोलिसांनी निवडणूक निकालानंतर आठच दिवसांतच एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्यासह त्यांचे वडील युनुस शेख यांना नोटिस धाडली आहे.या नोटिशीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार सोशल मीडियावर सामाजिक सलोखा धोक्यात येईल असे विधानं टाळा अशा पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र,आव्हाडांच्या बालेकिल्ल्यातच एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे. सहर शेख यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह आव्हाडांनाही मोठा धक्का मानला जात आहे. याचदरम्यान,सहर शेख यांनी विजयी झाल्यानंतर कैसा हाराया..? असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
याचसभेतील सहर शेख यांचं आक्रमक भाषणही तुफान गाजलं होतं.विजयानंतरचा त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून त्यात 'आपल्याला पुढच्या पाच वर्षांनी संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगून टाकायचा असल्याचं विधान केलं होतं. याच त्यांच्या विधानावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे.
पण नंतरच्या सहर शेख यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी मुंब्राबाबत केलेल्या आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.माझ्या हातात भगवा आणि हिरवा अशा दोन रंगांचे दोन धागे आहेत. माझ्या पक्षाचा झेंडा हिरव्या रंगाचा आहे,जर भगवा रंग असता तर मुंब्रा भगव्या रंगात रंगवा असं मी म्हणाले असते. रंग थोडीच कोणत्या धर्माशी जोडला जात असल्याचा आरोपही केला होता.
तसेच मी स्वतः सेक्यूलर विचारांची आहे,त्यामुळे सांप्रदायिक विधान माझ्या तोंडून कधीच निघणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.'मी बोलले तो सटायर पंच होता. त्याचा अर्थ प्रत्येक घर हिरवे करणे असा नव्हता. मुंब्रातील सर्व 25 जागा पाहिजेत, त्यासाठी ते विधान केलं होतं,' असे त्यांनी सांगितले. या मुद्द्याला सांप्रदायिक रंग देणं थांबवा असं आवाहनही त्यांनी केलं.विजयानंतर आक्रमक भाषण, जितेंद्र आव्हाडांनाही डिवचलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.