Mumbai News, 18 Jun : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-3' या पुरस्कारावरून टीकास्त्र डागलं आहे. शिवाय परदेश दौऱ्यावर असताना मोदींनी 'ही युद्धाची वेळ नाही' असं वक्तव्य केलं होतं. यावरून राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. पाकिस्तानला उद्ध्वस्त करू. पाकिस्तानचे चार तुकडे करू. पाकिस्तान म्हणजे हाती कटोरा घेतलेला एक भिकारडा, कंगाल देश असल्याचे मोदीभक्तांचे सांगणे होते. मोदी हे प्रत्यक्ष युद्ध भूमीवरच उतरले असे चित्र निर्माण झाले, पण आता अचानक मोदी हे शांतीचे पुजारी बनून मौनात गेले.
याचे श्रेय भाजपने प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांना द्यायला हवे. ट्रम्प यांनी मोदींची हवाच काढली. पाकविरुद्ध सुरू असलेले दहशतवादाविरुद्धचे युद्धच प्रे. ट्रम्प यांनी थांबवले. तेव्हापासून मोदी हे ‘ओम शांती शांती’चा मंत्र जपत आहेत, अशा शब्दात त्यांनी मोदींच्या भुमिकेवरून टीका केली. तर अहमदाबाद येथे विमान अपघातात 241 प्रवासी ठार झाले. देश शोकसागरात बुडाला असताना पंतप्रधान मोदी हे सायप्रस देशात जाऊन फोटो काढतात.
त्यांना तेथील राष्ट्रपतींनी मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-3’ बहाल केला. देश दुःखात असताना मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर गेले. गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशात 2027 च्या निवडणूक प्रचाराच्या तयारीचा नारळ फोडायला पोहोचले. लखनऊला त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.
पंतप्रधान मोदी कॅनडात ‘जी-7’ बैठकीलाही गेले, पण त्यांचे सायप्रसमधील वक्तव्य महत्त्वाचे आहे. सायप्रस मुक्कामी त्यांनी जागतिक शांततेचा राग आळवला. ‘‘युद्ध बरे नाही, ही युद्धाची वेळ नाही’’ असे ते म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले. मोदी यांच्या विचारात हा बदल नक्की कधी झाला? ते शांतिदूत कसे झाले? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले.
तर नोटबंदी करून देखील अतिरेक्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा होत असेल व त्यातून हल्ले वाढले असतील तर त्याला जबाबदार आपले गृहमंत्रालय असून मनी लॉण्डरिंग प्रकरणात भाजप विरोधकांवर कारवाया झाल्या, पण दहशतवादी मोकाट आहेत. भारतात दहशतवादी हल्ले, अपघात, मृत्यू यांचे राजकारण केले जाते.
उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपने मते मागितली, पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामागेही एक भावनिक राजकारण आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले, त्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला काय हे सायप्रस मुक्कामी शांती राग आळवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करायला हवे. कश्मीरात भाजपने राजकीय विचका केला व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पचका केला.
मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तो गळ्यात घालून ते भारतात परत येतील तेव्हा 26 लाडक्या बहिणींच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरची आठवण त्यांनी ठेवावी. सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.