

Mumbai News, 05 Jul : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
पक्षफुटी आणि आमदार खासदार फोडण्याच्या राजकारणावर त्यांनी या सदरातून जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी आपल्या लेखात लिहिलं की, 'देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे राजकारण्यांना नशामुक्ती केंद्रात भरती करणे ही भारतीय लोकशाही आणि संविधानाची गरज आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनाही अशाच प्रकारच्या उपचारांची गरज आहे, पण दिल्लीतील हे दोन्ही नेते उपचार करण्याच्या पलीकडे पोहोचले आहेत.
आमदार, खासदार विकत घेण्याचे, पक्ष फोडण्याचे व त्यानंतर पत्रकार परिषदेत रावणाप्रमाणे विकट हास्य करण्याचे, पत्रकार परिषदेत विकट-विकृत हसत दाढीवर हात फिरवायचा. हा रोग आहे. महाराष्ट्रात शिंदे यांची अवस्था टॉलस्टॉयच्या कथेतील त्या हावऱ्या म्हाताऱ्यासारखी झाली आहे. ही गोष्ट बकासुरासारखी आहे', असं म्हणत त्यांनी शेतीच्या मोहापायी जीव गमावलेल्या हावरट म्हाताऱ्याची गोष्ट सांगितली आहे.
शिवाय हा म्हातारा जमीनीच्या मोहापायी मेला आणि मेल्यानंतर त्याच्या वाट्याला केवळ सहा फूट लांब आणि दोन फूट रुंद एवढी जागा आली असं सांगत टॉलस्टॉयचा स्पष्ट संदेश आहे की, सत्ता, संपत्ती, जमीन, विकास निधी, राजकीय करीअरसाठी माणूस कितीही धावत राहो, फसवाफसवी करो. शेवटी तो कोसळून पडतो. त्याला फक्त सहा फूट जमीन लागते, अति हावरटपणा माणसाला नष्ट करतो. एकनाथ शिंदे सध्या टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे धावत सुटले आहेत. शिंदे कोसळतील तेव्हा मोदी, शहा, फडणवीस सहा फूट जमीनही देणार नाहीत, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना रोखठोक मधून लगावला आहे.
तर मोदी आणि शहांना देशातील सर्वच राजकीय पक्ष फोडायचे आहेत. त्यांचाही टॉलस्टॉयच्या कथेतला धावणारा म्हातारा झाला आहे, असं म्हणत त्यांनी मोदी-शहांवर देखील प्रहार केला आहे. दरम्यान, याच लेखातून त्यांनी नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेसेनेत गेलेल्या आमदार सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेत आले (फोडले) ते काही संत-सज्जनांचे कार्य पुढे नेण्यासाठी नक्कीच नाही. अहिर यांना पवारांनी सर्व काही दिले. मानप्रतिष्ठा, सत्ता, सुरक्षा. तरीही ते फुटले तेव्हा शिवसेनेत आनंदाचे वातावरण होते.
अहिर फुटले तेव्हा दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होते. अहिर फुटले व शिवसेनेत आले हे मी श्री. पवार यांना सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मला जाणवली. “मी त्याला काय द्यायचे बाकी ठेवले होते? सर्व काही दिले,” असे ते म्हणाले. पुढे अनेक दिवस सार्वजनिक कार्यक्रमांत पवार हे सचिन अहिर यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. त्यांच्या दृष्टीने तो विश्वासघात होता. तोच विश्वासघात अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत केला.
फडणवीस-शिंदे यांचे राजकारण हे विश्वासघातकी, बेइमान निर्माण करण्याचे आहे. त्यामुळे राज्यात विश्वासघाताचे पीक ते काढत आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी टॉलस्टॉयच्या कथेत एक म्हातारा होता. भारतातील राजकारणात म्हातारे वाढले आहेत. सध्या दिल्लीत दोन व महाराष्ट्रातही दोन आहेत. त्यांनी धावत राहिले पाहिजे, लवकरच कोसळण्यासाठी. टॉलस्टॉयच्या कथेतील म्हाताऱ्याप्रमाणे हे सगळे कोसळतील. तो दिवस दूर नाही, असं म्हणत त्यांनी मोदी-शहा आणि फडणवीस-शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.