

Mumbai, 03 July : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पहिल्या टप्प्यात एक आणि दोन जुलै रोजी या दोन दिवसांत राज्यातील १५४ हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणी केली आहे. त्यातील ३२ हॉटेल, रेस्टॉरंटचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली.
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटधारकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतरही त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना एफडीएचे आयुक्त मुंडे यांनी जोरदार दणका दिला आहे.
मार्गदर्शक सूचना केल्यानंतर एक आणि दोन जुलै रोजी ‘एफडीए’ने राज्यातील १५४ हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्यातील ३२ हॉटेल, रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर तब्बल ६६ हॉटेल, रेस्टॉरंटधारकांना सेवेत सुधारणा करण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत, असे तुकाराम मुंडेंनी सांगितले.
ठाणे आणि नाशिक विभागातील सर्वाधिक प्रत्येकी १० हॉटेल आणि रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे विभागात ७, अमरावती विभागात ४, छत्रपती संभाजीनगर विभागातील एका हॉटेल-रेस्टॉरंटवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे ही आयुक्त मुंडेंनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आपण ज्या ठिकाणी अन्न खातो, त्या ठिकाणी ते व्यवस्थित आहे का, हे बघणे अपेक्षित आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा परवाना आहे का ते बघा, असेही त्यांनी स्पष्ट केले. विभागानुसार बृहन्मुंबईतील १७ हॉटेलची तपासणी केली, त्यातील ५ हॉटेलला सुधारणा नोटीस दिली आहे.
कोकणातील २३ हॉटेलची पाहणी केली, त्यातील १० परवाने रद्द करण्यात आले आहेत. पुण्यात ५३ हॉटेलची पाहणी केली, त्यातील २५ जणांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून सात परवाने निलंबित करण्यात आले. नाशिकमध्ये २० हॉटेलची पाहणी केली, त्यातील १० हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले असून ७ जणांना सुधारणा नोटीस, छत्रपती संभाजीनगरमध्ये चार ठिकाणी तपासणी, एक परवाना निलंबित करण्यात आला.
अमरावतीमध्ये २३ ठिकाणी तपासणी केली, त्यातील १५ जणांना सुधारणा नोटीस, चार परवाने निलंबित केले आहेत. नागपूर विभागात १४ ठिकाणी तपासणी, त्यातील १० जणांना सुधारणा नोटिस देण्यात आली आहे. आजही यापेक्षा मोठी कारवाई सुरू आहे, असेही मुंडे यांनी नमूद केले.
अडीच कोटींचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त
मुंडे म्हणाले, पान गुटखा, पान मसाला विक्रीप्रकरणी गेल्या दाेन दिवसांत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. पाच दुकाने सील करण्यात आली असून चार वाहने जप्त केली आहेत. तब्बल २ कोटी ४१ लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.