

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरुन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांची महाराष्ट्रातून अंमलबजावणी सुरु झाली असल्याचं म्हणता येईल. पंतप्रधानांनी नुकतेच देशाला संबोधित करताना, इराण-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळं निर्माण झालेल्या जागतीक परिस्थितीवर मात करण्यासाठी जनतेला दैनंदित जीवनात विविध गोष्टींच्या काटकसरीचं आवाहन केलं होतं.
आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सध्याच्या कठीण परिस्थितीत राष्ट्रहित सर्वोच्च मानून आम्ही कान्स फिल्म फेस्टिव्हलचा नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या महोत्सवात सहभागी होणारे मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय व सहाय्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजनानुसार उपस्थित राहतील. तसेच, कान्स फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक तिथे दूरदृष्यप्रणाली द्वारे (online) सहभागी होणार. तसेच विभागीय खर्चांमध्ये संयम राखणे आणि विभागामार्फत होणाऱ्या रोजच्या बहुतांश बैठका व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. चला, आपण सर्वांनीही जबाबदारीची जाणीव ठेवत संसाधनांचा मर्यादित वापर करून राष्ट्रहिताच्या या प्रयत्नात सहभागी होऊया"
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद इथून १० मे रोजी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं की, युद्धामुळं जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करणे ही आता राष्ट्रीय गरज बनली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा वापर आपण आटोक्यात आणला पाहिजे. हे सांगताना मोदींनी जनतेला ७ गोष्टींच्या काटकसरीचं आवाहन केलं.
त्यानुसार, १) युद्धामुळं उद्भवलेल्या जागतिक संकटातून देशाला वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, २) परकीय चलन वाचवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल काटकसरीनं वापर करावा, ३) वाहतुकीसाठी मेट्रो, रेल्वे, कार-पूलिंग आणि ई-वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा, ४) कोरोना काळाप्रमाणं पुन्हा वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल मिटिंगवर भर द्यावा, ५) सोने खरेदी आणि परदेश दौरे एक वर्ष पुढे ढकलावेत, ६) रासायनिक खतांचा वापर कमी करुन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावं, ७) स्वदेशी उत्पादने वापरुन देशाला आत्मनिर्भर बनवावं.