

Nagpur News : नागपूर लोकसभा आणि विधानसभा या दरम्यानच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात मतदारांची संख्या भरमसाठ वाढली होती. विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने शंका व्यक्त केली होती. जी वाढ 50 वर्षांत झाली नाही ती 5 महिन्यात कशी झाली अशी विचारणाही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत घोळाची शंका व्यक्त करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदार संघातील अचानक वाढलेल्या मतदारांच्या संख्येबाबत संशय व्यक्त केला होता.
नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशातच निवडणूक यादीतील सुधारणेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता नागपूर जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये सुधारण केली जाणार आहे. बावनकुळे यांनीसुद्धा निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर'चे स्वागत केले आहे. सुधारित याद्यांमुळे निवडणुकीत पारदर्शकता येईल आणि यासाठी कितीही खर्च आला तर सरकार उपलब्ध करून देईल असे सांगितले. सोबतच विरोधकांचे आरोपही या निमित्ताने खोडून काढता येणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीपासूनच मतदार याद्यांमधील घोळ समोर आला आहे. याचा फटका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनासुद्धा बसला होता. त्यांच्याच कुटुंबातील अनेकांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाली होती. लाखो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. प्रशासनानेसुद्धा घोळ झाल्याचे मान्य केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात याद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढला होता.
वर्षानुवर्षांपासून त्याच त्या मतदार याद्या देशात वापरल्या जात आहेत. त्यात नव्या मतदारांची नोंद होत आहे. मात्र मृत झालेल्या किंवा गाव सोडून गेलेल्या आणि दुसऱ्या शहरात नोंदणी केलेल्यांची नावे मूळ यादीतून हटवली जात नाहीत. अनेकांच्या नावांवर बोगस मतदार झाल्याच्याही तक्रारी येत असतात. त्यामुळे संपूर्ण देशभरातील मतदार याद्या नव्याने करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला होता.
बिहार राज्यापासून याची सुरुवात झाली होती. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेस विचारधारेच्या लोकांना मतदार याद्यांमधून वगळण्यात येत असल्याचाही आरोप झाला होता. पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रासह नागपूरचीही मतदार यादी सुधारल्या जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील मजुरांना मतदार बनवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राहुल गांधी यांनीसुद्धा आपल्या लेखात कामठी मतदारसंघात उल्लेख केला होता. बावनकुळे यांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी काही पुरावेसुद्धा सादर केले होते. मात्र याची कोणी दखल घेतली नाही. मतदार याद्यांच्या सुधारणा कार्यक्रमातून बोगस नावे वगळली जाणार आहेत. याचे बावनकुळे यांनीसुद्धा स्वागत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.