

महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या प्रशासनात भारतीय प्रशासन सेवेतील नव्या दमाच्या अधिकाऱ्यांची एन्ट्री झाली आहे. हे सर्व अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या बॅचमधील आहेत. या अधिकाऱ्यांसाठी संबंधित 8 जिल्ह्यांमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे.
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथे फेज-1 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे अधिकारी आता जिल्हा प्रशिक्षणासाठी राज्यात रुजू होत आहेत. या अधिकाऱ्यांना पुढील 2 वर्षांसाठी (25 ऑगस्ट 2025 ते 24 ऑगस्ट 2027) संबंधित जिल्ह्यांमध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
नियुक्ती केलेले अधिकारी आणि त्यांच्याकडी जिल्ह्यांची नावे :
अजय काशिराम डोके यांची गडचिरोली जिल्ह्यात, अमल पी. व्ही. यांची पालघर, अप्सरा एन. यांची पुणे, दिव्यांक गुप्ता यांची बीड, जयकुमार शंकर आडे यांची नाशिक, पंकज मनोहर पटले यांची नंदुरबार, आर. रंगारामन यांची जालना आणि शोभिता पाठक यांची वर्धा या जिल्ह्यांमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे.
या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी 8 अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय 23 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रशासनात नव्या अधिकाऱ्यांचा समावेश होऊन जिल्हा स्तरावर प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमागे केवळ प्रशासकीय गरज नसून भविष्यातील नेतृत्व घडवण्याचा व्यापक उद्देशही आहे. जिल्हा स्तरावर काम करताना या अधिकाऱ्यांना महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करताना स्थानिक प्रश्नांची जाण आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी त्यांना मिळेल. नंदुरबार, गडचिरोली आणि वर्धा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जाते. या भागांमध्ये नक्षलप्रभावित क्षेत्र, आदिवासी विकास, पायाभूत सुविधा आणि आरोग्यविषयक आव्हाने आहेत.
पुणे, नाशिक आणि पालघर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आणखी वेगळी प्रकारची प्रशासकीय आव्हानांना सामोरे जावे लागते. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, स्थलांतरित नागरिक, कामगार, त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि या सगळ्यानंत पर्यावरणीय संतुलन राखणे या मुद्द्यांवर काम करावे लागते.
प्रशिक्षण कालावधीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकारी काम करतील. जिल्ह्यातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूही त्यांना प्रशासनातील सूक्ष्म बाबी शिकण्याची संधी मिळेल. विविध विभागांमधील समन्वय, धोरणांची अंमलबजावणी आणि लोकांच्या तक्रारींचे निवारण याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी पुढील जबाबदाऱ्यांसाठी तयार व्हावे, अशी अपेक्षा असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.