
Pune, 24 August : मागील दोन कृषिमंत्री वादग्रस्त ठरल्याने महायुती सरकारला नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. विशेषतः राष्ट्रवादीला विधानसभेत चांगले यश मिळूनही तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव ठाकरे यांची वादग्रस्त विधाने आणि त्या अगोदरचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढली होती. त्यातूनच नवा कृषिमंत्री निवडताना काय काळजी घेतली, याचा गौप्यस्फोट अजितदादांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात केला. तो करताना त्यांनी नवे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेंना जाहीरपणे सल्लावजा इशारा दिला आहे.
पुण्यातील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनात बोलताना कृषिमंत्री नियुक्तीच्या वेळी घेतलेली काळजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीरपणे प्रथमच सांगितली, त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) हे कृषिमंत्री आहेत. इंदापुरात एक मोठे शेतकरी म्हणून ते गणले जातात. कष्टातून पुढे आलेले आहेत. अतिशय उत्तम प्रकारची त्यांची शेती आहे. त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या काकांनी अतिशय चांगल्या प्रकारची शेती डेव्हल्प केलेली आहे. पण त्यांचे कुटुंब, त्यांचा परिवार आणि नातेवाईक सगळे शेतीत राबत असतात.
कृषिमंत्री भरणे यांच्या शेतात द्राक्ष, केळी आणि डाळिंब मोठ्या प्रमाणात आहेत. जी पिके आपण सर्वजण घेतो, ती त्यांच्या शेतात आहेत. त्यांची उसाची शेती चांगली आहे. भरणे यांचा पंधरा ते वीस हजार टन ऊस कारखान्याला गाळपाला जातो, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मी बघतच होतो, कृषिमंत्र्यांबाबत सारखं काहीतरीऽऽ काहीतरीऽ निघतंय. आता असा कृषिमंत्री शोधून काढतो की, त्याचं काही निघालंच नाही पाहिजे, असे म्हणतातच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आता तुझ्या साक्षीनं सांगितलं आहे, काही निघू देऊ नको,’ असाही सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना दिला.
‘आपण आता टीपटॉपपर्यंत पोचलोय’
द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाच्या अनेक वार्षिक अधिवेशनाला उपस्थित असलेला मी कार्यकर्ता आहे. आपले टप्पेही कसे उंचावत गेले, ते बघा. सुरुवातीला आपण डेक्कन जिमखान्यावर छोट्याशा हॉलमध्ये आपण बसायचो. त्या ठिकाणी आपण मिटिंग घ्यायचो. तिथून आपण हळूहळू निसर्गपर्यंत आपण पोहोचलो आणि तिथून गेली काही वर्षे आपण हॉटेल टीपटॉपर्यंत आलो आहोत, अशी काहींशी मजेशीर मांडणीही अजितदादांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.