Shiv Sena UBT Pune and Maharashtra Pollution Control Board News : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आंदोलन करत इंद्रायणीतील प्रदूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजून निषेध करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गट पुणे शहराच्या वतीने वारकरी तसेच माऊली भक्तांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिवाजी नगर पुणे कार्यालयावर इंद्रायणीचे प्रदूषित पाणी आणून त्याची प्रतिकात्मक पालखी करुन वारकरी बांधवांसोबत आंदोलन केले गेले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह उपमुखमंत्री आणि प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष यांच्याविरोधात आंदोलक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वांकडून वारकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे आरोप करण्यात आले. एवढचं नाहीतर प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्याआधी तीर्थ म्हणून इंद्रायणीचे प्रदूषित जल देखील पाजले अन् त्यांच्यासोबत शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी ही ते प्राशन केले.
ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी म्हटले की, 'इंद्रायणी(Indrayani River) नदीला हिंदू धर्मात मानाचे स्थान आहे, आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी महाराष्ट्र - कर्नाटक मधून आळंदीत येतात, ज्ञानेश्वर माऊलींच्या या आळंदीत इंद्रायणी प्रदूषणावर मागील अनेक दशके चर्चा चालू आहे. यावर मागील वर्षांमध्ये अनेक आंदोलने झाली, तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आजही निद्रा अवस्थेत असल्याचे दिसून येते.'
तसेच 'मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांनी यावर आवाज उठवूनही प्रशासन आणि सत्ताधारी यावर काहीच काम करीत नसून, फक्त आषाढी वारी आली की तात्पुरते मलमपट्टी करण्याचे काम चालू आहे आणि सत्ताधारी मिंधे-फडणवीस(Devendra Fadnavis) सरकार फक्त घोषणा करण्यात मग्न आहे आणि काम तर शून्य झाले आहे.' अशी टीकाही संजय मोरेंनी केली.
याशिवाय मोरे पुढे म्हणाले, 'वारकऱ्यांच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला आणि शासनाला ठणकावून सांगितले की, यापुढे शिवसेना(ठाकरे गट) प्रशासनाला प्रदूषित पाण्याने आंघोळ घालायला ही मागेपुढे पाहणार नाही, त्यामुळे तत्परतेने प्रदूषण मंडळाने याकडे लक्ष द्यावे .
गजानन थरकुडे यांनी बोलताना सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट यांची आजची परिस्थिती आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर पर्यावरण प्रेमी अनंत घरत यांनी नदी काठ सुशोभिकरणा पेक्षा नदी स्वछता, तसेच इंद्रायणी उगमापासून एसटीपी प्लांटची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे नमूद केले. यावेळी आंदोलनात आळंदीहून वारकरी स्वतः सहभागी झाले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.