
Pune News, 26 Jan : पुण्यातील (Pune) काही काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. त्यानंतर पक्षाकडून अशा बंडखोर नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभेला बंडखोरी केलेले हे नेते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
मात्र, या बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षात यायचं असल्यास एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांची घर वापसी होऊ शकणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातून सर्वाधिक बंडखोरी ही काँग्रेस (Congress) पक्षातून पाहायला मिळाली. काँग्रेसच्या या नेत्यांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवली. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर राहिलेल्या कमल व्यवहारे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष निवडणूक लढवली.
मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसने आपल्याकडे ठेवावा अशी आग्रही भूमिका माजी उपमहापौर आबा बागुल यांनी लावून धरली होती. मात्र जागा वाटपाच्या वाटाघाटीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने आबा बागुल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला.
त्यासोबतच कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून मनीष आनंद यांनी देखील नशीब आजमावलं. मात्र त्यांच्याही पदरी निराशाच पडली. हे सर्व नेते पक्ष निर्णयाविरोधात गेल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र निलंबित करण्यात आलेले काही नेते पुन्हा पक्षात येऊ इच्छित असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता या नेत्यांना पुन्हा पक्षामध्ये यायचं असल्यास त्यांना प्रदेश पातळीवर याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
प्रदेश पातळीवर पक्षात पुन्हा घ्यावं याबाबतचा विनंती अर्ज दिल्यानंतर प्रदेश पातळीवरून याबाबत स्थानिक पातळीवर विचारणा करण्यात येईल. स्थानिक पातळीवरून त्या नेत्याबाबत अहवाल तयार करून तो पुन्हा प्रदेश पातळीवर पाठवण्यात येईल त्यानंतर त्या अहवालाच्या आधारे त्या नेत्याची पक्षासाठी ची उपयोगिता पाहून त्याला पक्षात पुन्हा घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येईल असं काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. वॉर्ड आणि विभाग स्तरावर बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले असून सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. त्यासोबतच काँग्रेस कडून सर्वच्या सर्व प्रभागामध्ये उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी दोन संभाव्य उमेदवारांची यादी करण्यात येणार आहेत. वरिष्ठ पातळीवरून आघाडीचा निर्णय असला तर आघाडी अन्यथा स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.