
Mahayuti News: राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या डेडलाईननंतर आता राजकीय पक्षांसह प्रशासकीय पातळीवरही आता महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,यांच्या निवडणुकांसाठी एकामागोमाग एक मोठी पावले टाकली जात आहेत. यातच महाविकास आघाडीत शांतता असताना महायुतीत मात्र राजकीय हालचालींनी चांगलाच वेग पकडल्याचे दिसून येत आहे.
महायुतीत एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकीकडे स्वबळासाठी चाचपणीच्या आडून जोर लावल्याचे चित्र असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना मात्र भाजपसोबत युतीसाठी आग्रही भूमिकेत आहे. हा शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपवरचा भरोसा आहे की राजकीय हतबलता अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षासह पहिल्यांदाच एवढ्या लोकसभा आणि विधानसभा या एवढ्या मोठ्या निवडणुकांना सामोरे गेले. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अपेक्षापेक्षा चांगले यश मिळाले तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी 57 आमदार निवडून आणले. एकनाथ शिंदे यांना 30 ते 40 जागा मिळतील,असा अंदाज वर्तवला जात होता.
मात्र,तोच अंदाज फोल ठरवत शिंदे यांच्या शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 57 जागांवर विजय खेचून आणला. पण या प्रचंड मोठ्या य़शानंतर आत्मविश्वास दुणावल्यानंतरही शिंदे आणि त्यांची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीसाठी आग्रही आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लोकसभा आणि विधानसभेत विजयाचा स्टाईक रेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा कमी असताना स्वबळासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अजितदादांनी आत्तापर्यंत स्थानिकच्या निवडणुकांबाबत महायुतीत लढण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली दिसून आलेली नाही.
त्याचवेळी त्यांच्या राष्ट्रवादीच्या एकंदरीत राजकीय चालींनी ते स्वबळासाठी चाचपणी करत असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.पण एकीकडे कमी स्ट्राईक रेट असूनही अजितदादा आपला पत्ता भाजप किंवा महायुतीत ओपन करत नसताना तिकडे एकनाथ शिंदे किंवा त्यांची शिवसेना महायुतीत म्हणून लढण्यासाठीच आग्रही असल्याचे वारंवार समोर आले आहे.
एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात आणि शिवसेनेच्या मंत्री,आमदार,खासदार,पदाधिकारी यांसोबतच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना देताना आपण महायुतीतच लढणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांनी नुकतंच जळगावातील एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या त्या विधानामुळे शिवसेनेची भाजपसोबत युतीसाठी चाललेली धडपड ही जिंकण्याची हमी की हतबलता असा सूर राजकीय वर्तुळातून उमटू लागला आहे.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचीमहायुतीत लढण्यापाठीमागची भूमिका जरी प्रामाणिक आणि स्वच्छ असली तरी ती त्यांच्या पक्षाच्या मूळ स्वभावाला अडचणीत आणणारी अशीच आहे. बाळासाहेब ठाकरे असो वा उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत (BJP) युती करताना जागांबाबत फारशी तडजोड केल्याचं इतिहासात तरी खूपच कमीवेळा पाहिलं मिळालं आहे.परिणामी त्यांनी जागांचं गणित न जमल्यामुळे किंवा समझोता न केल्यामुळे युतीही तुटल्याचं 2014 दिसून आलं होतं.
पण आता गुलाबराव पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भाजपसोबतच्या युतीबाबत केलेलं विधान म्हणजे आमचा शिवसेना पक्ष एकप्रकारे जागांच्या तडजोडीलाही तयार असल्याचाच दाखवून दिलं आहे.पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते,त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा,आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो,पण युती करावी असं भावनिक आवाहन भाजपला केलं आहे.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाही?असा सवालही उपस्थित केला होता. तसेच दोन-चार जागा इकडे तिकडे करा,पण युती करा.जर युती केली नाही,तर कार्यकर्ते मरुन जातील असंही त्यांनी म्हटलं.
लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून लढण्याचे संकेत भाजपकडून दिले जात आहे. त्यामुळे शिवसेनेनंही युतीसाठी जास्त अगतिकता दाखवणं म्हणजे धोक्याची घंटा मानली जात आहे.तसं पाहिलं तर भाजप काय किंवा राष्ट्रवादी काय विधानसभेतल्या यशाचा स्ट्राईक रेट कायम राखण्याचं आव्हान महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांसमोर असणार आहे.
त्यामुळे एकीकडे अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादीनं 'अहिस्ते अहिस्ते' भूमिका घेतली असतानाच एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेनंही तशीच भूमिका घेणं अपेक्षित आहे.पण शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची भाजपसोबत युतीसाठी चाललेली धरपड म्हणजे जिंकण्याची हमी की बदललेल्या राजकीय समीकरणानंतरची हतबलता आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.