
गुहागरमधील नेत्रा ठाकूर, विलास वाघे, दत्ताराम निकम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
हा प्रवेश आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी घरच्या मैदानावर धक्का मानला जात आहे.
भास्कर जाधव यांनी इशारा दिला की, माझ्या आमदारकीस अजून चार वर्षे आहेत, हे विरोधक विसरू नयेत.
Ratnagiri News : सत्तेतून शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाजूला गेल्यापासून पक्षाची मोठी हाणी झाली आहे. कोकणासह राज्यभरात शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाताना दिसत आहेत. तळ कोकणात तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर राबवून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडवून आणले आहेत. आताही पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. मात्र याकडे लक्ष न देता कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट दंड थोपाटत विरोधकांसह पक्ष सोडणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचीच सध्या कोकणासह राज्यात चर्चा होत असून शिवसेनेत नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
कोकणात अनेक मात्तबर नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने पक्षात नेतेच नाहीत अशी अवस्था येथे झाली आहे. रत्नागिरीत भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत खिंड लढवत असून त्यांच्यात दुरावा आहे. तर अद्याप भास्कर जाधव यांचा विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवर कोणताच निर्णय झालेला नाही. याचा थेट परिणाम स्थानिक पातळवर होताना दिसत आहे. तर शिवसेनेचे पदाधिकारी सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाताना दिसत आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत गुहागर मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सभापती विलास वाघे, माजी सभापती दत्ताराम निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे आमदार भास्कर जाधव यांना त्यांच्याच होमग्राऊंडवरच धक्का दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे भास्कर जाधवांचे टेन्शन वाढल्याचीही चर्चा होती.
पण मैदान सोडतील ते भास्कर जाधव कसले. त्यांनी थेट पक्ष सोडणाऱ्यांसह पक्ष फोडणाऱ्यांही आता अंगावर घेण्याचं ठरवलं आहे. याबाबत भास्कर जाधव यांनी, माझ्या आमदारकीची अजून चार वर्षे शिल्लक आहेत. याची जाणीव पक्ष सोडणाऱ्यांना नसली तरीही विरोधकांना नक्कीच असल्याचे म्हणत इशारा दिला आहे. त्यांनी, एकाने पक्ष सोडला म्हणून काय झाले त्या ऐवजी चार कार्यकर्ते मी तयार करेन, असा विश्वासही गुहागर मतदारसंघातील शिवसैनिकांना दिला आहे. याचे सध्या पत्र व्हायरल होत असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. तर जाधव यांनी पक्षातील पडझड थांबवण्यासाठी लवकरच मुंबई आणि मतदार संघात जाहीर मेळावे घेणार असल्याची घोषणाही केली आहे.
जाधव यांची ही घोषणा आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिसह नुकताच काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या घटनेवरून केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात, जे पक्षातून अन्य पक्षात गेले ते सांगत फिरत आहेत की, आमचा राग आमदार भास्कर जाधवांवर नाही. मतदार संघाचा व आमच्या भागाचा विकास त्यांनीच केला. कोट्यवधींचा निधी जाधव यांनीच आणला. मग पक्ष सोडायचे कारण काय? याचे कारण एकच सत्तेत जायचे आहे. आम्हाला विकास करून घ्यायचा आहे. त्यांच्या या विधानामुळे मी संभ्रमात आहे. कारण, ज्या विकासासाठी ते अन्य पक्षात गेल्याचे समर्थन करतात याचा अर्थ ते स्वतःशी खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहेत. त्यांचा प्रवेश केवळ वैयक्तीक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी आहे.
राजकीय कारकिर्दीबाबत ते म्हणाले, दोनवेळा आलेल्या निसर्गाच्या संकटावेळीही सर्वांच्या पाठी ठाम उभा राहिलो. नुकसान भरपाई मिळवून देण्यासोबतच सर्वांचे जीवन पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा गुहागरमध्ये आणली. लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य बजावण्यात मी कधी कसूर केली नाही. असे असताना जे पक्ष सोडून गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरिता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असे सांगत आहेत. पण माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरिता किती पैसे आणले आणि कोणता विकास केला, हे जरा तपासून बघा. आता जे गेलेत ते विकासाकरिता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत, हेही जरा अनुभवा आणि कसल्याही भूलथापांना बळी पडू नका.
गुहागरमध्ये मी 2007 पासून काम करायला सुरुवात केली. त्या वेळी कोणत्याही गावात एखादा सरपंचदेखील आपल्या विचाराचा नव्हता. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांशी आपुलकीने वागून विरोधकांच्या धाकदपटशाही, दहशतवाद व खोतीविरोधात लढून खऱ्या अर्थाने विकासाचे खरे रूप गुहागरला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे आमदार जाधव यांनी सांगितले.
1. गुहागरमध्ये कोणते नेते शिवसेनेत सामील झाले?
नेत्रा ठाकूर, विलास वाघे आणि दत्ताराम निकम या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
2. भास्कर जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी इशारा दिला की, माझ्या आमदारकीस अजून चार वर्षे शिल्लक आहेत आणि विरोधकांना याची पूर्ण कल्पना आहे.
3. या प्रवेशामागे कोण उपस्थित होते?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, भरत गोगावले आणि संजय कदम हे प्रमुख नेते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.