

Gen Z politics India : कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनानंतर केवळ भारतच नव्हे तर देशभरात त्याची चर्चा होत आहे. या आंदोलनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला मागील १२ वर्षांत पहिल्यांदाच मोठा हादरा बसला. धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दबावामुळे झालेला मोदींच्या मंत्रिमंडळातील हा पहिला राजीनामा होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांनी भाजपला तरुणाईच्या मुद्द्यावरून घेरत सरकारला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील राजकीय वारं फिरू लागलंय, अशी चर्चाही जोर धरू लागली आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका या प्रमुख चेहऱ्यांमागे नेमके कोण आहे, हे भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात आहे. दिपके हे आधी आम आदमी पक्षाचे काम करत होते. त्यामुळे या पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचेच त्यांना पाठबळ असल्याचा दावा भाजप नेते करत होते. त्यानंतर यामागे राहुल गांधी असल्याचा दावा काहींना केला. केवळ भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनाच सीजेपीकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात 'दिमागी नक्षल' हा शब्द वापरत एक सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सीजेपीला टार्गेट केले आहे. 'CJP' म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असे नामकरण फडणवीस यांनी केले आहे. भारत जोडो यात्रेतील 180 संघटनाच आता नव्या नावाने CJPच्या माध्यमातून मैदानात उतरल्या असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सीजेपीसह काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. मात्र, त्याचवेळी त्यांनी सीजेपी म्हणजे त्या १८० संघटनाचे आव्हान अजूनही आपल्यासमोर असल्याची एकप्रकारे कबुलीच त्यांनी दिली आहे. भारत जोडो यात्रेतील चेहरेच सीजेपीच्या व्यासपीठावर दिसत असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काही संघटनांचे थेटच नक्षलवादाशी कनेक्शन असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.
फडणवीस हे सातत्याने शहरी नक्षलवाद असा शब्दप्रयोग करत काँग्रेससह या संघटनांवर निशाणा साधत आहे. आता त्यांनी एकप्रकारे सीजेपीलाही यामध्ये ओढले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, युवकांसह नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजपकडून सीजेपीचे जेन झीच्या मनावरील गारुड कमी करण्याचा अटोकाट प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियासह जमिनीवरही कार्यकर्त्यांना अलर्ट करण्यात आले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोशल मीडियात रील्स करत जेन झीला आपलेसे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
एकीकडे जेन झीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरेकडे कॉक्रोच जनता पार्टीच्या कनेक्शन बाबतही बोलले जात आहे. एकप्रकारे सरकारविरोधात तयार होत असलेला नॅरेटिव्ह बदलण्याचा भाजपचा हा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचीही आठवण झाली. भारत जोडोतील त्याच १८० संघटनांनी लोकसभेत नॅरेटिव्ह तयार केला, विधानसभेत नॅरेटिव्हमध्ये आपल्यासमोर हरले. आता तेच पुन्हा नवीन नाव घेऊन मैदानात उतरत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
कार्यपध्दतीतील बदल आपल्यासा समजून घेतला पाहिजे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. देशाला, इथल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न खूप जण करत आहेत, पण त्यांच्या या कार्यपद्धतीला बळी न पडता आपल्याला ती कार्यपद्धती ओळखायला शिकावे लागेल, असे संदेश मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. मागील काळातील सीजेपीचे वाढते प्रस्थ पाहता भाजपसमोर हे आव्हान निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मागील काही दिवसांतील केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची विधाने, सोशल मीडियातील पक्षाच्या आयटी सेलने तयार केलेली आक्रमक रील्स पाहता भाजपकडून या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीची रणनीती आखण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.