Bihar Election Eknath Shinde : बिहारच्या निवडणुकीत ‘एकनाथ शिंदे’ गाजणार, पण कोंडी भाजपची होणार; गेहलोतांनी वात पेटवली...
Ashok Gehlot Targets BJP Leadership Over Election Strategy : बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्येच थेट सामना होणार आहे. त्यातच गुरूवारी आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा करत मोठा डाव टाकला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली अन् याचवेळी त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आठवण झाली.
पत्रकार परिषदेत बोलत असताना गेहलोत यांनी भाजपवर निशाणा साधताना एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखविले. आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित झालेला आहे, आता एनडीएनेही आपला उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी गेहलोत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे एनडीएने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
एनडीएचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेण्याबाबतचे सूचक विधान केले होते. त्यावरूनच गेहलोत यांनी एकनाथ शिंदे यांचे उदाहरण दिले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. पण निवडणुकीच्या निकालानंतर दुसरेच मुख्यमंत्री झाल्याचे सांगत गेहलोत यांनी नितीश कुमार यांचीही शिंदे यांच्याप्रमाणे अवस्था होऊ शकते, असे संकेत दिले.
गेहलोत यांच्या या विधानामुळे आघाडीकडून बिहारमध्ये आता भाजपची कोंडी केली जाणार, हे निश्चित. त्यासाठी वारंवार एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आघाडीच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये येणार असल्याचे संकेत गेहलोत यांनी दिले आहे. मात्र, भाजपने नितीश कुमार यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केल्यास त्यावर पडदा पडेल.
दुसरीकडे आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत महाराष्ट्रात केलेली चूक टाळल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते सातत्याने तशी मागणी करत होते. खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार तशी विधाने येत होते. पण आघाडीने याबाबत निर्णय घेतला नाही, त्याचा फटका बसल्याचा दावाही त्यांनी निकालानंतर केला.
बिहारमध्ये मात्र काँग्रेसने सावध भूमिका घेत सहयोगी पक्षांवर विश्वास दाखवला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंच्या पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. बिहारसाठी जे योग्य होते तो निर्णय काँग्रेसने घेतल्याने आनंद झाल्याचे चतुर्वेदी यांनी सोशल मीडियात म्हटले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत केलेली चूक बिहारमध्ये करू नये, असे म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.