
अंजली दमानिया आणि अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती आणि सावली बार येथे जाऊन चौकशीही केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात दीर्घकाल मौन बाळगले होते, परंतु त्यांनी रत्नागिरीला जाऊन थेट कदम यांना पाठिंबा दिला.
शिंदे यांनी "मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणत राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला असल्याचे बोलले जात आहे.
Ratnagiri Political News: पावसाळी अधिवेशनात गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम प्रचंड टीकेच्या घेऱ्यात सापडले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार अनिल परब यांनी तर एकाच अधिवेशनात योगेश कदम यांना दोनवेळा अडचणीत आणले होते. सुरुवातीला वाळू प्रकरणावरून आणि नंतर डान्स बारचा आरोप करून कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपांमुळे कदम यांच्यासह शिवसेनाच बॅकफूटवर गेली होती.
अधिवेशन संपल्यानंतरही अनिल परब, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरत कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अंजली दमानिया यांनी तर कदम यांच्या सावली बार येथे जाऊन पाहणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा पार पडला. या दौऱ्यानंतर वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण कदम यांच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत होते.
शिंदे यांनी ना आरोपांवर कोणती प्रतिक्रिया दिली, ना राजीनाम्याच्या मागणीवर काही बोलले. पण आता एकनाथ शिंदे यांनी कदम यांची थेट रत्नागिरीला जाऊनच पाठराखण केली आहे. यावेळी योगेश कदम यांना हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे, असा शब्दही दिला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अनिल परब यांनी नियमांवर बोट ठेवत, योगेश कदम यांचे नाव न घेता विधीमंडळात गंभीर आरोप केले होते. महसूल राज्यमंत्रीच वाळू चोरी करत आहेत, असा आरोप करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत कोंडीत पकडले होते. तसेच बावनकुळे अशा राज्यमंत्र्यांचे निलंबन करण्याची हिंमत, ताकद दाखवणार का असा सवाल केला होता.
त्यावेळी बावनकुळे यांनी परब यांचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यांनी डिटेल माहिती द्यावी. मी सभागृहात अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निवेदन करेल, असे आश्वासन देत वेळ मारून नेली होती. त्यामुळे योगेश कदम वाळू प्रकरणात थोडक्यात बचावले होते. पण कांदिवलीतील सावली बारवरील पोलिसांच्या कारवाईने पुन्हा एकदा योगेश कदम परबांच्या हिटलिस्टवर आले.
सावली बारवर कारवाई करत पोलिसांनी 22 बारबाला व 22 ग्राहकांना पकडले होते. हा बार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचे समोर आले होते. यानंतर परब यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत महायुतीची कोंडी केली. परब यांनी विधानपरिषदेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप करताना कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा? असाही सवालही परब यांनी केला होता. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य ती कारवाई करतीलच. पण मुख्यमंत्र्यांनी देखील गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी केली होती.यावरून मुख्यमंत्र्यांनी देखील, परब यांनी मला सर्व पुरावे आणून द्यावेत, मी चौकशी करतो, असे आश्वासन दिले होते.
वाळू प्रकरण असो किंवा सावली बारचे प्रकरण असो. योगेश कदम घेरले जात असताना, त्यांचा राजीनामा मागितला जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ते शांत होते, यामुळे आता योगेश कदम यांचा पत्ता कट होणार अशाच चर्चा राज्यात सुरू झाल्या होत्या. पण एकनाथ शिंदे यांनी थेट योगेश कदम यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची पाठराखण केली आहे.
योगेश कदम काम करणारा कार्यकर्ता आहे, टीका करून काम बंद करता येत नाही. राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. जे दरोडेखोर आहेत तेच दुसर्याला चोर म्हणत आहेत. योगेशवर खोटे आरोप केले आहेत. आरोप करणाऱ्यांनी स्वतः काय केले याचे उत्तर द्यावे. चोर चोर म्हणणार्यांचे खरे रूप जनतेने ओळखले आहे. आरोप करणार्यांची जागा जनता ठरवत असते.
योगेश तु चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे, असा शब्दच त्यांनी दिला. शिंदे यांच्या शब्दामुळे सध्या आरोपांनी घेरलेल्या योगेश कदम यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जाते. थेट 'गॉडफादरचा' हात डोक्यावर असल्याने त्यांचा राजीनामा होणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
प्रश्न 1: योगेश कदम यांच्यावर नेमकं काय आरोप आहे?
उत्तर: सावली बार प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप करण्यात आले असून अंजली दमानिया यांनी त्याची तपासणी केली आहे.
प्रश्न 2: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे?
उत्तर: त्यांनी रत्नागिरीला जाऊन कदम यांना पाठिंबा दर्शवला आणि राजीनाम्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला.
प्रश्न 3: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: फडणवीस यांनी या प्रकरणावर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर नाराज मंत्र्यांवर कारवाईची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.