
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सात वर्ष या पदावर होते. एप्रिल 2018 मध्ये पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडेपर्यंत ते एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्यांनतर ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 12 जुलै 2025 रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
सात वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पक्षासाठी मोठी मेहनत घेतली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवल्याचे समजते. नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणूक, त्यात जिंकलेल्या जागा
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केली होती. यावेळी एकूण 19 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये एकूण 5 जागा जिंकल्या होत्या. बारामतीमधून सुप्रिया सुळे, सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे, अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा विजयी झाले होते. या निवडणुकीत मोदी लाटेत देखील राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते.
2019 ची विधानसभा निवडणूक, त्यात जिंकलेल्या जागा, मिळालेले मतदान
विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 54 जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 121 जागांवर लढवलेल्या उमेदवारांपैकी 54 जागा जिंकल्या. या निकालाद्वारे त्यांच्या जागा 41 वरून 54 वर वाढल्या, म्हणजेच 13 जागांची वाढ झाली होती. 288 जागांसाठी एकूण 61.4 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला सुमारे 16.71 टक्के इतके मतदान म्हणजे 92 लाख 16 हजार 919 मते मिळाली
महाविकास आघाडी सरकार स्थापनेतील त्यांचा पुढाकार
2019 मध्ये महायुतीमध्ये लढलेली शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत आली. निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत केलेली निवडणूकपूर्व युती तोडून आघाडीसोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युतीऐवजी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली. त्यासाठीची जुळवाजुळव करण्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुढाकार घेतला होता.
2023 मधील पक्षफुटीवेळी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै 2023 मध्ये उभी फूट पडली. त्यावेळी जयंत पाटील शरद पवार यांच्यापाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी पक्षाचे मोठे नुकसान होऊ दिले नाही. सदैव नेतेमंडळीच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्याला थांबवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्ष सोडून जात असलेल्या नेतेमंडळींचे मत परिवर्तन केले. विशेषतः भाजपने त्यांना उघडपणे पक्षप्रवेश करण्याची ऑफर दिली होती. मात्र, ते ठामपणे पक्षाच्या बाजूने उभे राहिले.
2024 च्या लोकसभा निवडणूक, त्यात जिंकलेल्या जागा, मिळालेले मतदान
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. या यशामध्ये जयंत पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. यावेळी 10 जागी निवडणूक लढवीत 8 जागा जिंकल्या होत्या. स्ट्राइक रेट जवळपास 80 टक्के इतका होता. यावेळी शरद पवार यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले. विशेषता महाविकास आघाडीची कामगिरी लोकसभा निवडणुकीत दमदार राहिली होती.
2024 ची विधानसभा निवडणूक, त्यात जिंकलेल्या जागा, मिळालेले मतदान
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीत 86 जागा लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ 10 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभव स्वीकारावा लागला होता. अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्याच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे, खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके यांनी प्रचार सभा गाजवल्या होत्या. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही.
राष्ट्रीय पक्षाचा गमावलेला दर्जा
राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच नागालॅंडमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 4 जागा मिळाल्या होत्या. पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठी तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते. ती पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. निवडणूक चिन्ह कायदा 1968 नुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा, विदर्भात पक्षवाढ करण्यास आलेले अपयश
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची कामगिरी सरस ठरली नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडा, विदर्भात पक्षवाढ करण्यात त्यांना अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेसची मदार केवळ पश्चिम महाराष्ट्रावर राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षवाढीवर भर देण्याचे आव्हान नव्या अध्यक्षासमोर राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.