
कोल्हापूर जिल्ह्याची फेररचना: राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीची नव्याने गट व गण रचना झाली असून करवीर तालुक्यात सर्वाधिक गट व गण आहेत.
राजकीय समीकरणात बदल: या फेररचनेमुळे काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता असून, महायुती (शिवसेना-भाजप) ला संधी मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीची रणनीती व तयारी: विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची शक्यता असून इच्छुक नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
kolahapur News : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर जिल्हा परिषदेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे गट आणि गणाची रचना करण्यात आली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक गट आणि गणाची संख्या ही करवीर तालुक्यात आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद 12 व पंचायत समितीचे 24 सदस्य करवीर तालुक्यात आहेत.
फेररचनेमध्ये पाडळी खुर्द या नवीन गटाची निर्मिती झाली आहे. वास्तविक त्यामुळे करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे नेहमीच वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसला यानिमित्ताने धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय गणिते बिघडणार असून त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. शिवसेना आणि भाजपने यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर काँग्रेसचे (Congress) वर्चस्व राहिले आहे. मात्र, नव्याने झालेल्या फेररचना आणि राजकीय सत्ता पाहिली तर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. नव्याने झालेले गट व गण आणि गावाची मोडतोड केल्याने अनेकांची गणिते बिघडली तर काहींचे गणित सोपे झाले आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने 11 पैकी पाच गट जिंकत करवीर तालुक्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिवाय रसिका पाटील या अपक्ष विजयी उमेदवाराने काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला. संख्याबळ अधिक झाल्याने पंचायत समितीवर देखील काँग्रेसचे वर्चस्व राहिले.
नव्याने झालेल्या फेररचनेत करवीर तालुक्यात सर्वाधिक गट आणि गणाची संख्या आहे. करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याने त्याचा फायदा होण्याचा अंदाज घेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) व भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
‘शिये’, ‘वडणगे’ या गटावर आमदार चंद्रदीप नरके यांची पकड आहे. तर कळंब्यात भाजपची सत्ता आहे. ‘शिंगणापूर’ चा निकाल प्रत्येक वेळी धक्कादायक लागला आहे. येथून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवार कोण? हे जरी महत्त्वाचे असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व काँग्रेसमध्ये अटातटीची लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच या रणांगणात सर्वतोपरी तयारीनशी उतरणार असल्याचे चित्र आहे. एकूणच राजकीय चित्र पाहिले तर सध्या इच्छुकांमध्ये वेट आणि वॉच याचीच भूमिका आहे. कारण प्रत्यक्षात आरक्षण काय पडणार यावर गणित राहणार आहे. आरक्षणानंतरच इच्छुक पत्ते ओपन करणार आहेत.
कोणत्या तालुक्यात सर्वाधिक गट व गण आहेत?
➤ करवीर तालुक्यात सर्वाधिक गट आणि गण आहेत.
फेररचनेचा सर्वात मोठा राजकीय परिणाम काय आहे?
➤ काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महायुती कोणत्या पक्षांचा समावेश आहे?
➤ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांचा समावेश आहे.
उमेदवारांनी अजून पत्ते उघडले का?
➤ नाही, आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच पत्ते उघडले जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.