Loksabha Election 2024 : फायरब्रँड नेते, हायव्होल्टेज प्रचार अन् हतबल समाज

Maharashtra Politics : वक्तृत्वशैली अमोघ असली की आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, जणू असाच काहीसा समज काही नेत्यांचा झाला आहे.
Tejasvi Surya.
Tejasvi Surya.Sarkarnama

Political News : राजकीय पक्ष जिंकण्यासाठीच म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. त्यांनी केलेली कामे सांगून अथवा भविष्यात ते काय करणार हे सांगून मते मागणे अपेक्षित असते. पण निवडणुकांचा प्रचार अनेकवेळा भलतीकडेच जातो. संबंधित राजकीय पक्षाला त्याचा फायदा होत असला तरी समाजात मात्र दुही निर्माण होते. त्यामुळे शांततापूर्ण सहजीवनाच्या संकल्पनेला तडा जातो. (Loksabha Election 2024)

निवडणुका लागल्या की जाती-धर्माचा विचार सर्वच पक्ष करतात. उमेदवारी देताना जात-धर्म हा आता महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारातही जात-धर्म प्रभावी ठरत आहे. उजव्या विचारसरणीचे पक्ष यात आघाडीवर असतात. गेली दहा वर्षे केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार आहे. या सरकारने मोठी विकासकामे केल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातो.

मग निवडणुकीत या पक्षाला धार्मिक विभाजनाच्या मुद्द्यावर का यावे लागते, असा प्रश्न सर्वांनाच पडायला हवा. अशा प्रचाराचा समाजावर दूरगामी परिणाम होतो. मने कलूषित होतात. शिवाय लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न बाजूला फेकले जातात. यामध्ये फायदा फक्त राजकीय पक्षांचा होतो. त्यांची पोळी भाजते, मात्र समाजात दुहीची बिजे पेरली जातात.

Tejasvi Surya.
Nanded Lok Sabha Constituency : चिखलीकर-चव्हाण जोडीला महाविकास आघाडीचा 'दे धक्का'?

हल्ली नेत्यांना फायरब्रँड अशी उपाधी लावण्याची पद्धत सुरू झाली आहे. धडाकेबाज भाषण करणे, ही त्यासाठीची पहिली अट असते. नेते धडाकेबाज भाषण करतात, आपल्या वक्तृत्वकलेने लोकांची मने जिंकतात, मात्र त्याद्वारे ते विचार कोणते मांडतात, हे पाहणेही गरजेचे आहे. नेत्यांच्या वक्तृत्व कलेने, धडाकेबाज भाषणांनी समाजात दुफळी निर्माण होत असेल, तरुणांची डोकी बिघडवली जात असतील तर त्यापासून नुकसानच अधिक होणार आहे. असे पक्ष निवडणूक जिंकून जातात आणि त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. अशा फायरब्रँड नेत्यांचे सध्या पीक आलेले आहे. त्यांच्या आक्रस्ताळेपणासमोर, हेकेखोरपणासमोर समाज हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कर्नाटकमध्ये भाजपचे (BJP) असेच एक फायरब्रँड नेते आहेत, तेजस्वी सूर्या असे त्यांचे नाव. बंगळुरू दक्षिणचे ते विद्यमान खासदार आहेत आणि या निवडणुकीत उमेदवारही आहेत. वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी ते ओळखले जातात. ऐन निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली असून, तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे अनेक गुन्हे दाखल होत असतात. मात्र फार कमी प्रकरणांत जबर शिक्षा होते. त्यामुळे तेजस्वी सूर्या यांना त्याचे काहीही वाटणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होईल, याची कल्पना त्यांना नसेल, असे समजणे निव्वळ भाबडेपणाच ठरेल. त्यांनी केलेले वादग्रस्त विधान असे.-भाजपचे 80 टक्के समर्थक आहेत, मात्र मतदानासाठी 20 टक्केही बाहेर पडत नाहीत आणि काँग्रेसचे 20 टक्के समर्थक आहेत, मतदानासाठी मात्र 80 टक्के बाहेर पडतात.

तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर (x)पोस्ट केला होता. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आणि धर्माच्या नावाने मते मागितल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर 25 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 80 टक्के कोण आणि 20 टक्के कोण, याची फोड करून सांगण्याची गरज नाही. ते लगेच लोकांच्या लक्षात येते.

गेली दहा वर्षे केंद्रात तेजस्वी सूर्या यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्यांच्या सरकारने केलेल्या कामांवर मते मागण्याऐवजी त्यांनी धार्मिक मुद्द्यावर मत मागितले. तेजस्वी सूर्या यांच्यासमोर काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांचे आव्हान आहे.

Tejasvi Surya.
Ajit Pawar On Supriya Sule : मला तर लाज वाटली असती, तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागता, दादांचा ताईंना सवाल !

सौम्या या कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या कन्या आहेत. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीची काँग्रेसची सूत्रे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D.K. Shivkumar) यांनी हाती घेतली आहेत. मंत्रिपद टिकवायचे असेल तर रामलिंग रेड्डी यांना कन्या सौम्या यांना निवडून आणाले लागणार आहे. त्यामुळे मंत्री रेड्डी यांनी या मतदारसंघात प्रचंड जोर लावला आहे. त्यामुळे तेजस्वी सूर्या हे अखेरचा उपाय म्हणून धार्मिक मुद्द्यावर आले असतील.

असे फायरब्रँड नेते सगळीकडेच आहेत, महाराष्ट्रातही आहेत आणि सर्वच पक्षांत आहेत. उजव्या विचारसरणीचे पक्ष आणि अन्य पक्षांतील अशा नेत्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे. उजव्या विचारसरणीच्या पक्षांतील असे नेते धार्मिक मुद्द्यांवर अधिक बोलतात. त्यात एक विशिष्ट धर्म त्यांच्या निशाण्यावर असतो. अशा काही नेत्यांना न्यायालयाने नुकतेच खडे बोल सुनावत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

असे असले तरी काही मोठे नेतेही निवडणुकीच्या प्रचारात धर्माला आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अन्य पक्षांतील फायरब्रँड नेते धर्माचा मुद्दा प्रचारात फार कमी वेळा आणतात, मात्र विरोधकांवर टीका करताना त्यांनाही भान राहत नाही. अशा फायरब्रँड नेत्यांचे करायचे काय, त्यांच्यापासून आपल्या समाजाची सुटका कधी होणार, हे प्रश्न दुर्दैवाने सध्यातरी अनुत्तरितच आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Tejasvi Surya.
Nanded Lok Sabha Constituency : चिखलीकर-चव्हाण जोडीला महाविकास आघाडीचा 'दे धक्का'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com