

Maharashtra Municipal Elections Analysis : शहरी मतदाराला नेमकं काय हवं आहे, याचा गेल्या 5 वर्षांपासून केलेला अभ्यास, विधानसभा निवडणुकीनंतर वाढलेला आत्मविश्वास, ज्या ठिकाणी विरोधक वरचढ आहेत तिथे टीका सहन करूनही विरोधकांना पक्षात प्रवेश देऊन केलेले तिकीट वाटप आणि नवमतदारांवर असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव; यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.
सोलापूरमध्ये विरोधकांना गलितगात्र करत त्यांचा शब्दशः धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता काबीज केली, तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून त्यांच्या तोडीस तोड जागा मिळविण्यात भाजपला यश आले. सोबत कोणीही असो, 'आम्हीच किंगमेकर' असल्याचे या निकालाने भाजपने सिद्ध केले आहे.
'भाजपचे मूळ कार्यकर्ते केवळ सतरंजी उचलण्यापुरतेच राहिलेत', 'भाजपमध्ये तर सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीचेच लोक आहेत', 'भाजपमध्ये जा आणि सर्व पापं धुवून घ्या' अशा बोचऱ्या टीकेला फारसे महत्त्व न देता भाजपने ज्या-ज्या महापालिकांमधील प्रभागांत उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी होती, तिथे विरोधी पक्षांतील नेत्यांना साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून पक्षात प्रवेश दिला.
भाजपमध्ये प्रवेशासाठी बहुतांश ठिकाणी रांगा लागल्या. कितीही टीका झाली तरी निवडणूक चांगल्या मताधिक्याने जिंकण्यासाठी भाजपने 'इनकमिंग'चा पॅटर्न यशस्वीपणे राबविला आणि त्यास राज्यभर यश मिळाल्याचे दिसून आले. अर्थात, भाजपच्या विजयाचा केवळ हा एकच घटक कारणीभूत नाही.
एका निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच भाजप पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करतो. ही पूर्वतयारी, पक्षबांधणी, कार्यकर्ता प्रशिक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर संलग्न संघटनांचा नियोजनबद्ध वापर हे भाजपच्या यशाचे रहस्य आहे. आज सर्व पक्ष महापालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यात दंग असताना, पुण्यात भाजपची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यांचा हा सातत्यपूर्ण 'निवडणूक मोड' या पक्षाला विस्तारत आहे, हे विरोधकांना नाकारून चालणार नाही.
निवडणूक केवळ तंत्रावर जिंकता येत नाही हे खरे असले, तरी 'मायक्रोप्लॅनिंग' तुम्हाला यशापर्यंत नेण्यास उपयुक्त ठरते, हे या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. केवळ सत्ता आणि पैसा निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसा नसतो; या दोन्ही शक्ती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडेही होत्या, पण सत्तेपर्यंत जाणारे केडर आणि 'पक्षापेक्षा कोणी मोठा नाही' ही शिस्त भाजपला या निवडणुकीत तारून गेली.
शहरे झपाट्याने वाढत असून त्यांच्यासमोर वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा आणि परवडणारी घरे अशा अनेक समस्या आहेत. मेट्रो, रिंग रोड, 24 तास पाणीपुरवठा यांसारखे प्रकल्प नागरिकांना हवे आहेत. ही गरज ओळखून ते पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर दिलेला भरही फायदेशीर ठरला.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता असणाऱ्या अहिल्यानगरमध्ये यावेळी आमदार संग्राम जगताप यांचाच करिश्मा चालला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप यांची निवडणूकपूर्व युती झाली होती. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि जगताप यांची समीकरणे अचूक जुळली. नगरमध्ये जगताप यांच्याशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे विखे यांनी आणि पर्यायाने भाजपने ओळखले; परिणामी ही युती सत्तेत आली.
शरद पवार किंवा फडणवीस या दोघांनीही स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली होती. महापालिका प्रशासक काळात आमदार जगताप हेच कारभार पाहत होते. रस्ते, ड्रेनेज यांसाठी आणलेला निधी आणि केलेली विकासकामे यांचा फायदा जगताप यांना झाला. जगताप यांच्याशी समन्वय साधत भाजपनेही आपल्या जागा वाढवल्या आणि बरोबरीची ताकद निर्माण केली. हा विजय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची दिशा बदलणारा ठरणार आहे.
ज्या सोलापूर शहरात काँग्रेसचा खासदार आहे आणि जिथे काँग्रेस कार्यकर्त्यांची मजबूत फळी होती, तिथे भाजपने आता नावालाही विरोधक शिल्लक ठेवले नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूरमधील राजकीय घडामोडी पाहता भाजप सहज सत्तेवर येईल, असा अंदाज होताच. माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना भाजपने पक्षात घेतले. यामुळे सुरुवातीला दोन्ही आमदार देशमुखांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
पक्षात काही काळ 'नाराजी नाट्य' रंगले, पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी योग्य वेळी मध्यस्थी करून पक्षाला एकसंध ठेवण्यात यश मिळवले. दुसरीकडे, काँग्रेसचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आला. 'एमआयएम'मधील महत्त्वाचे नेते बाहेर पडले असूनही, त्या पक्षाने आपली ताकद दाखवत दुसरे स्थान पटकावले. बहुभाषिक सोलापूरमध्ये भाजपने जातीय गणिते अत्यंत प्रभावीपणे मांडली, ज्याचा त्यांना मोठा लाभ झाला. केंद्र आणि राज्यातील सत्ता तसेच विकासकामांचा फायदा दोन्ही ठिकाणी भाजपला झाला. 'विरोधक विखुरलेले असतील तरच भाजप सुरक्षित आहे', हेच या निकालाने स्पष्ट केले आहे.
सोलापूर : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने (BJP) 'सोशल इंजिनिअरिंग' आणि बहुभाषिक गणिते वापरून वर्चस्व मिळवले.
अहिल्यानगरचा: विखे-पाटील आणि जगताप ही नवी राजकीय मैत्री जिल्ह्याची समीकरणे बदलणारी ठरली.
१. विरोधी नेत्यांचे यशस्वी 'इनकमिंग' (उदा. दिलीप माने, संग्राम जगताप युती).
२. निवडणूक व्यवस्थापनाचे 'मायक्रो-प्लॅनिंग'.
३. शहरी विकासाचे (मेट्रो, पाणीपुरवठा) ठोस आश्वासन.
४. 'लाडकी बहीण' योजनेचा महिला मतदारांवरील प्रभाव.
५. संघासह संलग्न संघटनांची बूथ स्तरावरील बांधणी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.