
Maharashtra Political News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अनपेक्षित असलेल्या संभाव्य युतीमुळे दोन्ही पक्षांनी रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असतानाही आता दोन्ही पक्ष महायुतीच लढण्यावर ठाम आहेत.
आतापर्यंतच्या निवडणुकीत मुंबई महापालिका हा एकसंध शिवसेनेचा (shivsena) गड राहिला आहे. यावेळी मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा उचलण्याची तयारी भाजपने केली होती. शिवसेनेची मुंबईत ताकद मर्यादित आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांना मुंबईत यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपने सुरुवातीपासूनच स्वबळाचा सूर आकारला होता. सर्वच पक्ष स्वबळावर लढले तर भाजपचा (BJP) फायदा होईल, असे गणित मांडले होते.
भाजपसोबत शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे आणि काँग्रेस हे पाचही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले असते तर मराठी भाषिकांची मते विभागली गेली असती. तर हिंदी भाषिकांची एकत्रित मते भाजपकडे आली असती. त्याचा फायदा भाजपला झाला असता त्यांचे समीकरण होते. गरज पडल्यास निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेता आले असते असे प्लॅनिंग केले होते.
मात्र, गेल्या दोन महिन्यापासून मुंबईतील चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपला त्यांचे प्लॅनिंग बदलावे लागणार आहे. विशेषतः दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीशी मराठी मतदारांचा मोठा जनाधार असल्याने त्यांना त्याचा फायदा होणार आहे.
राज-उद्धव एकीचा काय होणार परिणाम
मुंबईत ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद मोठी आहे. मराठी भाषिक पट्ट्यात त्यांच्या पाठीशी मतदार मोठ्या प्रमाणात उभे राहतील, असे चित्र आहे. दादर, माहीम, परळ, लालबाग, वरळी, अंधेरी, वांद्रे, भायखळा या मराठी भाषिकांच्या पट्ट्यात ठाकरे बंधूंची ताकद मोठी आहे. त्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळेच सुरुवातीपासून स्वबळावर लढण्यास उत्सुक असलेल्या भाजपला आता एकत्रित लढावे लागणार आहे.
मराठी मते एकत्रित येणार
मुंबई हा शिवसेनेचा पारंपारिक गड राहिला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपचा शिवसेनेच्या मराठी व्होट बँकेवर डोळा आहे. शिंदेंसोबत युती करून ही मते आपल्याकडे खेचता येतील हा भाजपचा प्रयत्न आहे.
मुस्लिम, उत्तर भारतीय मतांचे समीकरण
मुंबईत मुस्लिम, उत्तर भारतीयांची मते देखील निर्णायक ठरणार आहेत. उत्तर भारतीयांची मते भाजपसोबत जातील तर मुस्लिम मतदार भाजपला विरोध करणारा पर्याय म्हणून काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनकडे वळू शकतात.
त्यामुळे सध्या तरी भाजप मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी काही भागांत थोडा कमजोर ठरत आहे. युती करून या सामाजिक गटांमध्ये समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे युतीने पुन्हा शिवसेनेचा गड हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.