
Mahavikas Aaghadi News : लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकलेल्या महाविकास आघाडीत त्यावेळी श्रेयवादासाठी नुसती चढाओढ पाहायला मिळत होती.पण त्याच आघाडीचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाफ झाल्यावर यशाचे वाटेकरी आता अपयशाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. तसंच झालं गेलं विसरुन नव्या उमेदीनं चालायच्या मानसिकतेतही दिसून येत नाही.
असं म्हणतात की, जिंकलेल्या पेक्षा काही पटीनं मेहनत केल्यावरच तुम्ही पुन्हा प्रतिस्पर्ध्यांना हारवू शकतात.पण महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) नेमकं याच्या उलटं चित्र सध्या दिसतंय. एकीकडे प्रचंड यश मिळवलेल्या महायुतीतील एकापाठोपाठ दोन मंत्री अडचणीत,नेत्यांची पळवापळवी सुरू असतानाच महाविकास आघाडी मात्र 'सायलेंट मोड'वरच असल्याचं चित्र आहे.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.त्यादृष्टीनं महायुतीनं जोरदार मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.पण महाविकास आघाडी कुठल्याच अॅक्शनमध्ये दिसून येत नाही. ठराविक नेते आपलं मीडियातलं त्यांचा प्रेझेन्स दाखवतात.पण पक्ष, आघाडीची मूठ घट्ट करण्यासाठी प्रमुख नेतेही पुढाकार घेताना पाहायला मिळत नाही.त्यामुळे कोणीही कितीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा करत असला तरी तो सध्या भरवशाचा नाही अशीच सध्य़ा परिस्थिती आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल 230 पेक्षा आमदारांचं संख्याबळ सोबत घेऊन महायुती (Mahayuti) सत्तेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीनही प्रमुख नेत्यांनी सत्तेच्या जोरावर आपआपला पक्ष अधिकाधिक मजबूत करण्याची रणनीती आखताना दिसून येत आहेत.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर वारं फिरल्याचा साक्षात्कार होऊन शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दाखल झालेले मंडळी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महायुतीच बरी म्हणत परतीच्या वाटेवर आहेत.त्यामुळे ठाकरे असो की पवार दोन्ही नेत्यांच्या पक्षांमध्ये चलबिचल आहे.
एकीकडे देशपातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत फाटाफूट सुरू आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही फारकाही आश्वासक वा एकीचं चित्र सध्यातरी नाही. त्यामुळे भक्कम बहुमतातील महायुतीचे सरकारमधील भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांकडून विरोधी महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील दोन मित्रपक्षांवर केलेली टीका खूप बोलकी होती.पण अहंकार,इगो आणि आपण भलं अन् आपला मतदारसंघ भला वृत्तीच्या नेत्यांनी भरलेल्या पक्षांनी तीही टीका नेहमीप्रमाणे एका कानानं ऐकली अन् दुसर्या कानानं सोडून दिली.कोल्हेंनी जरी ती टीका आपल्या पक्षाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून का होईना काँग्रेस, शिवसेनेला डिवचलं होतं.तरी त्या अपमानातून जागे होण्याची तयारीही कुठे दिसून आली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पराभवानंतरही काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही.तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही,असा सल्ला दिल्यानंतर महाविकास आघाडीत टीकेचं राजकारण तापलं होतं. पण आत्मचिंतन करून नेमकं काय चुकलं, किंवा पुढं काय असा विचार तरी समोर यायला हवा.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक बदलाचं वारं वाहत आहे. नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर आता काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी ही संधी मोठी आहे. जमिनीवर उतरुन जर गावागावांत ते पोहोचले, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रान पेटवलं गेलं तर काँग्रेस पुन्हा ट्रॅकवर येईल. पण नव्यानंच प्रदेशाध्यक्षपद गळ्यात पडलेल्या सपकाळांना काँग्रेसमधील सरंजामी नेत्यांचं पाठबळ मिळणंही तितकंच महत्वाचं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर कित्येक महिने तर महाविकास आघाडीच्या पक्षांची कोणतीही बैठक झाली नव्हती.त्यानंतर सुरूवातीला दुसर्या फळीतील नेतेमंडळी भेटली.चाय पे चर्चा काय झाली,काहीच समजलं नाही.तसेच त्या बैठकीनंतर पुन्हा कुठेच ती मंडळी एकत्रित पावलं टाकताना दिसली नाही.
आघाडीचे प्रमुख नेत्यांनी ठोस कुठला मुद्दा मांडला किंवा सत्ताधारी पक्षावर तुटुन पडले असं चित्र न दिसल्यामुळे सत्ताधारी पक्षही प्रचंड खूश आहे. त्यातच शरद पवारांनी दिल्लीत एकनाथ शिंंदेंचा सत्कार करून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंच शेअर करत महाविकास आघाडीलाच गुगली टाकली. या गुगलीवर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना क्लिन बोल्ड झाले. पण त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही सुस्तावस्था निश्चितच धोक्याची घंटा आहे.त्यामुळे आतातरी उद्धव ठाकरे,शरद पवार यांना 'स्थानिक'साठी पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.