
Kabutarkhana Ban : मुंबईत कबुतरखाने बंद करण्याचा वाद प्रचंड चिघळला आहे. जैन समाज कबुतरखाने सुरु ठेवा म्हणून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतल्या कबुतरखान्यांमध्ये जाऊन त्यांना नियमित दाणापाणी करणं ही जैन आणि गुजराती समाजाची परंपरा आहे. यातून पुण्य मिळते अशी या समाजाची धार्मिक आस्था आहे. तर मराठी एकीकरण समितीने कबुतरखाने बंदच ठेवावे म्हणून समर्थनार्थ आंदोलन सुरु केले आहे.
यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकार आणि महापालिकांनी सावध आणि जैन-गुजराती समाजाला पुरक भूमिका घेतली. सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबुतरांना खाद्य घालण्यात यावे अशी सरकारने भूमिका मांडली. तर पालिकेनेही सकाळी 6 ते 8 खाद्य देण्याचं विचाराधीन आहे, असे म्हंटले. यापूर्वी राज्य सरकारनेच कबुरतखाने बंद करण्याची घोषणा केली होती.
या कबुतरखान्यांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यानंतरही भूमिका बदलल्याने राज्य सरकार जैन आणि गुजराती समाजाच्या आंदोलनापुढे नमले असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि मुंबईमध्ये असलेला जैन-गुजराती समाजाचा दबदबा यामुळे सरकारने यु-टर्न घेतल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईत जैन आणि गुजराती समाजाचा दबदबा :
जैन समाजाची देशातली लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 0.4 टक्के आणि मुंबईत 4 टक्के आहे. गुजराती समाज मुंबईत 19 टक्के आहे. मूळचा व्यापारी असलेल्या या समाजाच्या हातात मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती एकवटली गेली आहे. मुंबईत घाटकोपर, माटुंगा, मुलूंड, गोरेगाव, कांदिवली भागामध्ये या समाजाची मोठी वस्ती आहे.
मुंबईत आणि उपनगरात उभ्या राहणाऱ्या टॉवरचे काम सुरु होण्यापूर्वी तिथे जैन मंदिरांची पायाभरणी होते. मराठी किंवा मांसाहार खाणाऱ्यांना घर विकले जाणार नाही, असा तिथे अलिखित नियम असतो. मुंबईतील काळबादेवीपासून दादरपर्यंत आणि घाटकोपरपासून मालाडपर्यंतच्या बाजारपेठा या वर्गाच्या हातात आहे.
याच जोरावर अनेकदा त्यांच्याकडून अलिकडच्या काळात पर्युषण काळात मटणाची दुकाने, कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी पुढे येत असते. आता कबुतरखाने बंद ठेवण्याच्या विरोधातील आंदोलनही याच दबदब्यातून जन्माला आल्याचे बोलले जाते. हीच मतदारसंख्या आणि महापालिकेतील स्थानिक मतदान विभागणी लक्षात घेत भाजप आणि शिवसेनेसाठी जैन-गुजराती समाज महत्वपूर्ण झाला आहे.
जैन-गुजराती समाज भाजपची व्होट बँक :
ठाकरे बंधू एकत्रित आल्यास एकगठ्ठा मराठी मते पारड्यात पडतील, असे सांगण्यात येत असले तरी ते शक्य नाही. मुंबईतील 38 टक्के मराठी मतांपैकी 12 ते 15 टक्के मते भाजपला मिळू शकतात. तेवढीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात. 4 ते 5 टक्के मते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि 4 ते 5 टक्के मते काँग्रेसला मिळू शकतात.
अशावेळी भाजपला जैन आणि गुजराती मते गेमचेंजर ठरू शकतात. जैन आणि गुजराती समाज ही भाजपची हक्काची व्होट बँक आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या एकगठ्ठा मतदारांना नाराज करणे भाजपला परवडणारे नाही. न्यायालयाचा आदेश असला तरीही काही ना काही करून उपाय शोधून कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी द्यावीच लागेल. त्यामुळेच सरकारने भूमिका बदलल्याची चर्चा सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.