ज्ञानेश्वर भंडारे
NCP News : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांपुढे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. पारंपरिक मतदार, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक संपर्कजाळे या दोन्ही पक्षांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, ही ताकद विखुरली आहे. पक्षफुटीनंतर कार्यकर्ते, मतदार आणि स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आजही काही अंशी दिसतो आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारमध्ये महायुतीचा घटक आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात थेट आक्रमक भूमिका घेताना कोणी दिसत नाही. परिणामी, पक्षाची स्वतंत्र राजकीय ओळख झाकोळली जाण्याचा धोका आहे.
त्यामुळे आपण सत्तेत आहोत की विरोधात, हे स्थानिक नेतृत्वाने ठरवायला हवे. गेल्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे एकटे लढले. सत्ताधाऱ्यांना नडले. पण, त्यांच्या निधनानंतर पक्ष म्हणून तशी भूमिका घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत सर्व काही तडजोडीवर अवलंबून आहे का? अशी शंका येते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपविरोधी मतदारांना आकर्षित करण्याची संधी आहे. मात्र, प्रभागनिहाय संघटना, बूथ पातळीवरील यंत्रणा आणि सर्व भागांत सक्षम कार्यकर्त्यांची उपलब्धता ही या पक्षाची मोठी अडचण आहे. काही ठिकाणी आक्रमक चेहरे असले, तरी शहरभर एकसंध राजकीय ताकद उभी राहिलेली दिसत नाही.
पुन्हा विश्वासार्हता हवी! पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, मालमत्ता कर, आरोग्य, कचरा, स्मार्ट सिटीअंतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही, अनधिकृत बांधकामे आणि कथित गैरव्यवहार असे अनेक मुद्दे शहरात आहेत.
हे मुद्दे थेट नागरिकांशी संबंधित असूनही दोन्ही ‘राष्ट्रवादी’कडून व्यापक जनआंदोलन उभे राहिलेले नाही. परिणामी, भाजपविरोधी नाराजीचे राजकीय भांडवल करण्याची संधी असून दोन्ही पक्षांना अपयश आले आहे.
सध्या राष्ट्रवादीकडे मतदारांचा काही अंशी आधार असला, तरी स्पष्ट नेतृत्व, आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक ताकद नसल्याने ती परिणामकारक ठरत नाही. त्यामुळे केवळ भाजपला रोखणे नसून स्वतःला पुन्हा विश्वासार्ह पर्याय उभे करण्याचे आव्हान आहे.
- पारंपरिक कार्यकर्ते व माजी नगरसेवकांचा आधार
- महापालिका कारभाराचा अनुभव असलेले नेते
- सभागृहात भाजपविरोधात आवाज उठवतात, मात्र प्रत्यक्ष कृतीत आक्रमकपणा कमी
- महायुतीमुळे भाजपविरोधात थेट भूमिका घेण्यास मर्यादा
- भाजपच्या प्रभावाखाली स्वतंत्र ओळख झाकोळण्याचा धोका
- स्थानिक नेतृत्व अधिक स्पष्ट करण्याची गरज
- प्रभागनिहाय नवीन कार्यकर्ते आणि तरुण चेहरे तयार करणे आवश्यक
- भाजपविरोधी मतदारांना आकर्षित करण्याची संधी
- काही भागांत आक्रमक चेहरे
- सर्व प्रभागांत मजबूत संघटनात्मकतेचा अभाव
- बूथ पातळीवरील यंत्रणा अपुरी
- सक्षम पदाधिकारी निवडीची मोठी कसोटी
- भावनिक निष्ठेपेक्षा स्थानिक प्रश्नांवर काम करण्याची गरज
दोन्ही पक्षांसमोरील आव्हाने
- मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक समन्वयाची गरज
- भविष्यातील बंडखोरी रोखण्यासाठी रणनीतीची आवश्यकता
- पाणी, रस्ते, कर, आरोग्य, कचरा या मुद्द्यांवर संयुक्त किंवा स्वतंत्रपणे सातत्यपूर्ण लढ्याची गरज
- सोसायटी, झोपडपट्टी, कामगार वस्त्या आणि नवमतदारांपर्यंत संपर्क गरजेचा
- उमेदवारीत जिंकण्याची क्षमता, स्वच्छ प्रतिमा आणि स्थानिक उपस्थितीला प्राधान्य द्यावे
- संघटन आणि कामगिरीवर भर देण्याची गरज
- प्रत्येक प्रभागात सक्रिय कार्यकर्ता यादी तयार करणे
- बूथनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करणे
- नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन पाठपुरावा करणे
- महापालिकेतील मुद्द्यांवर आकडेवारीसह भूमिका घेणे
- स्थानिक पातळीवर नियमित बैठका आणि जनसंपर्क वाढवणे
- भाजपविरोधी नाराजीचे मतांमध्ये रुपांतर करण्यासाठी मोहीम उभी करणे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.