
Jayant Patil : इस्लामपूर-वाळवा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून ते सलग आठव्यांदा निवडून आले आहेत. 2024 च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांना पराभूत करण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. त्यांचे कट्टर विरोधक निशिकांत पाटील यांना भाजपमधून आयात करत उमेदवारी दिली.
निशिकांत पाटील यांनीही चांगली फाईट दिली. यात जयंत पाटील अगदी थोडक्या मतांनी विजयी झाले. पराभवाची गोळी जयंत पाटील यांच्या कानाजवळून गेली. पण आता जयंत पाटील यांच्या याच वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा आणि त्यांचे राजकारण धोक्यात आणण्याचा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केला आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांनी सांगली ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी वाळवा-इस्लामपूर मतदारसंघातीलच चेहरा दिला आहे. यातून विरोधातील शक्तींना ताकद देऊन पाटील यांची कोंडी करण्याचे नियोजन असल्याचे चिन्हे आहेत. कधी काळी लाखांचे लीड घेणाऱ्या पाटील यांचे यंदा लीड काही हजारांवर आले होते. अजून थोडा जोर लावला तर पाटील यांनाही पराभूत करू शकतो असा विश्वास तिन्ही नेत्यांना आल्याचे दिसून येते.
नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक निशिकांत भोसले-पाटील यांची राष्ट्रवादीच्या सांगली ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यापूर्वी भाजपने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून सम्राट महाडिक यांची नियुक्ती केली आहे. तर याआधीच शिवसेना जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आनंदराव पवार यांच्याकडे दिली आहे.
नियुक्ती होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे निशिकांत पाटील म्हणाले. पण खरंतर विधानसभा निवडणुका संपताच निशिकांत पाटील कामाला लागले होते. माजी आमदार राजेंद्र देशमुख, विलास जगताप, शिवाजीराव नाईक, अजित घोरपडे यांना राष्ट्रवादीत आणण्यात निशिकांत पाटील यांची महत्वाची भूमिका होती.
जयंत पाटील यांच्याविरोधात विरोधकच एकवटत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे. पण सम्राट महाडिक यांनी यापुढे जिल्ह्यात गटा-तटाचे राजकारण न करता, कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी भाजपचे काम करायचे आहे, असे म्हणत आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील आजी, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर,प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार असे नेते सम्राट महाडिक यांच्या सत्काराला उपस्थित होते. यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात आपल्या नेत्यांची मोठ बांधण्यात यश मिळवले आहे. हीच बाब जयंत पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून 50 हजार मते मिळावली होती. तिथूनच भाजपने हे नेतृत्व हेरले. 2024 मध्येही महाडिक इच्छुक होते. पण विधानसभेला सत्यजित देशमुख यांना तिकीट मिळाले. पण महाडिक यांनी देशमुख यांना ताकद देवून आमदार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता सम्राट महाडिक यांना ग्रामीणचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे.
फुटीनंतर शिवसेनेचे नेतृत्व करणारे आणि जयंतराव यांचे कट्टर विरोध असणारे आनंदराव पवार देखील संधीची वाट पाहत आहेत. आनंदराव पवार यांनी शिवसेना फुटीनंतर राज्यात सर्वात आधी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले होते. शिंदे यांनीही त्यांना जिल्हाध्यक्ष करत बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी येथे अद्याप नेतृत्व बदलले नाही. त्यामुळे आताही येथे आनंदराव पवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यात संघटन होताना दिसत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वाळवा तालुक्यात दुष्काळी भागातील काही योजनांची कामांसाठी त्यांनी निधी खेचून आणला आहे. तसेच शिंदे उपमुख्यमंत्री असल्याने शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीतून देखील ते सक्रिय असून मतदारसंघात कामांना गती देत आहेत. ही बाब देखील आगामी स्थानिकसाठी शिवसेनेसाठी जमेची तर जयंत पाटील यांना अडचणीत आणणारी ठरणार आहे.
आता इस्लामपूर नगरपालिका , वाळवा नगरपंचायत, वाळवा पंचायत समिती आणि सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिन्ही पक्षांच्या रडारवर आहेत. 2017 मध्येच भाजपने सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. पण जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेली इस्लामपूर नगरपालिका आणि वाळवा नगरपंचायत जिंकून जयंत पाटील यांना स्थानिक राजकारणात हादरा देण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांचा असल्याचे दिसून येते.
पाटील यांची खरी ताकद ही कारखाना, दूध संघ आणि अन्य सहकारी संस्थांमध्ये आहे. शिराळा, इस्लामपूर, वाळवा, कुंडल हा भाग पाटील यांच्या संस्थांच्या लाभक्षेत्रात येतो. स्थानिकच्या पार्श्वभूमीवर या संस्थांची माहिती असणारा आणि या भागाचीही ओळख असलेला माणूसही आवश्यक असल्याने वाळवा तालुक्यालाच तिन्ही पक्षांनीही महत्व दिल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.