
Mumbai News : आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आता केवळ ते महाविकास आघाडीमधून निवडणूक लढणार की वेगळे लढणार याची उत्सुकता आहे. नुकतेच काँग्रेसने ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला काही अडचण नाही असे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण राज ठाकरे काँग्रेसला सोबत जाण्यास तयार होणार का? हा कळीचा मुद्दा आहे. याबाबत काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली असता मुंबईतील मतविभागणी लक्षात घेतल्यास ठाकरे बंधूंना काँग्रेससोबत जावेच लागेल, असे मत व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) एकत्रित आहेत. या तीन पक्षांचे सूर जुळले आहेत. मात्र, या महाविकास आघाडीत मनसे येणार का? याची उत्सुकता लागली आहे. मनसेला आघाडीत सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मनसेला आघाडीत घेतल्यास काँग्रेसला बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो. मुंबईतही उत्तर भारतीय, हिंदी भाषिक आणि मुस्लिम समाजाची मते आघाडीपासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट करत ठाकरे बंधूंच्या युतीला ग्रीन सिग्नल दिला आहे.
मात्र, मनसे (MNS) काँग्रेससोबत येणार का याची उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे देखील काँग्रेससोबत जाण्यास तयार होणार नसल्याची चर्चा आहे. पण राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबईतील भाषिक मतविभागणी लक्षात घेतल्यास ठाकरे बंधू एकत्रित सर्वात जास्त जागा जिंकतील, पण सत्तेपर्यंत पोहचणे कठीण आहेत. सत्ता आणायची असल्यास ठाकरे बंधूंना काँग्रेसला सोबत घेणे अत्यावश्यक आहे. मराठी मतांचे दोन्ही शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये होणारे विभाजन गृहीत धरले जात आहे. त्याचवेळी भाजपकडे असणारे गुजराती समाजाचे तर काँग्रेसकडे असलेले 19 टक्के मुस्लीम समाजाचे मतदान या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार आहे.
काय आहे कारण?
येत्या काळात ठाकरे बंधू एकत्रित आल्यास एकगठ्ठा मराठी मते पारड्यात पडतील, असे सांगण्यात येत असले तरी ते शक्य नाही. मुंबईतील अनेक मराठी माणसे ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मानणारी आहेत. त्यामुळे मुंबईतील 38 टक्के मराठी मतांपैकी 12 ते 15 टक्के मते भाजपला मिळू शकतात. तेवढीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात. 4 ते 5 टक्के मते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि 4 ते 5 टक्के मते काँग्रेसला मिळू शकतात. ही मतांची विभागणी लक्षात घेतल्यास मुंबईमध्ये अन्य भाषिक मतदारांची टक्केवारी महत्वाची ठरते.
यात मुख्य आहेत ती भाजपकडे झुकलेली गुजराती समाजाची आणि उत्तर भारतीय आणि आघाडीकडे असलेली 19 टक्के दलित आणि मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काही प्रमाणात उत्तर व दक्षिण भारतीय मते काँग्रेसकडे वळू शकतात. हीच मते भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसाठी गेमचेंजर ठरू शकतात.
2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 30.41 टक्के मते मिळाली होती. तर भाजपला 28.30 टक्के मते मिळाली तर काँग्रेसला 16.69 टक्के मते तर मनसेला 8.52 टक्के मते, राष्ट्रवादी काँग्रेसला 5.74 टक्के, समाजवादी पक्ष 4.73 टक्के तर अपक्ष 6.30 टक्के मते मिळाली होती.
येत्या निवडणुकीत कोणाचे असणार वर्चस्व :
शिवसेनेत उभी फूट पडली असल्याने शिवसेनेचे 12 ते 15 टक्के मते कमी होऊ शकतात. तर काँग्रेसच्या मतांमध्ये फारसा फरक पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे. दुसरीकडे आगामी काळात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासह मनसे एकत्र आली तर मताची टक्केवारी 40 ते 45 टक्के होईल. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन करण्यापासून ठाकरे बंधूंना कोणीच रोखू शकणार नाही, असे अंदाज वर्तवले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.