राहुल क्षीरसागर
Ulhasnagar News : जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट भाजप अशी युती झाली असली तरी उल्हासनगरत मात्र हे सत्ताधारी दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत. त्यामुळे सिंधी समाजाभोवती फिरणाऱ्या राजकारणाला एक वेगळे वळण लागले आहे. शहरात शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोघांची ताकद समसमान आहे. त्यामुळे महापालिका जिंकण्यासाठी या दोन्ही पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सत्तेचे गणित जुळवण्यासाठी शिंदे गटाने टीम ओमी कलानी आणि साई पक्ष यांना जवळ केले आहे. दुसरीकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना काट शहा देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उल्हासनगर पालिकेसाठी या दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्यात विरोधी पक्षही काटे की टक्कर देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उल्हासनगर महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार आहे.
उल्हानगर महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. यंदाची उल्हासनगर महापालिका निवडणूक ही शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारी ठरू लागली आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या पालिकांमध्ये शिवसेना शिंदे सेना व भाजपची युती झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, उल्हासनगर पालिका याला अपवाद ठरली आहे.
काही जागांवरून या ठिकाणी युतीत मिठाचा खडा पडला आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगताना दिसून येणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातील पालिका असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात टीम ओमी कलानीसह साई पक्षाला आपल्या सोबत घेण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या आकड्यांचा खेळ मांडण्यात देखील ते यशस्वी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपने मिळालेले यश यामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास व स्फुरण संचारले आहे. त्यातच भाजप ज्येष्ठ आमदार कुमार आयलानी यांचे राजकीय अनुभव आणि पक्ष बांधणी त्यामुळे नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाताना, “महापौर भाजपचाच” असा दावा केला जात आहे.
इच्छुकांना व पक्षातील अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने नाराज झालेल्या अनेक अनुभवी आणि दिग्गज नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. या अपक्ष उमेदवारांमुळेच अनेक प्रभागांतील लढतीतील रंगत येणार असून ते ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उल्हासनगर महापालिका निवडणूक ही केवळ आकड्यांची लढाई नसून, नेतृत्व, स्थानिक प्रभाव आणि संघटनशक्तीची खरी कसोटी ठरणार आहे. मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उल्हानगर पालिका क्षेत्रातील २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ७०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६१८ अर्ज वैध ठरले, तर १८६ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अखेर ४३२ उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. शहरात ४ लाख ३९ हजार ९१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २ लाख ३२ हजार ७३६ पुरुष, २ लाख ०७ हजार ०२२ महिला आणि १५४ इतर मतदार यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.