
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकांची रणधुमाळी लांब असली तरी तयारी वेगाने सुरु आहे. दोन दिवसापूर्वी राज व उद्धव ठाकरे बंधूनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला. त्यामुळे आता येत्या काळात राजकीयदृष्ट्या मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रित कधी येणार याची उत्सुकता सैनिकांना लागली आहे. दोन्ही बाजूचे नेतेमंडळी आदेशाची वाट पाहत आहेत.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील महायुती विरोधी पक्षाने रान पेटवले होते तर सरकार विरोधात आक्रमक होत विरोध दर्शवला होता. मात्र, यामुळे बॅकफुटला आलेल्या महायुती सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर मागे घेत दोन पावले मागे घेतली होती. त्यामुळे मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेनेने (Shivsena) मेळावा रद्द करीत विजयी मेळावा आयोजित करीत मोठे शक्तीप्रदर्शन केले.
वरळीतील डोम सभागृहात उद्धव व राज ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र आले. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्याने मोठा जल्लोष केला. त्यामुळे मुंबईतील वातावरण काही काळासाठी बदलले दिसले. यावेळी ऐकत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र राहणार असल्याचे जाहीर करून युतीची घोषणा केली मात्र दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भाषण करताना एकत्र आलो आहोत. मात्र, युती करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत युती होणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठाकरे बंधूनी एकत्रित लढाव्यात यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले तर समीकरण बदलणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसापासून नेतेमंडळीकडे चाचपणी सुरु केली आहे. त्यांनी नेत्यांना निवडणुकीबाबत विचारणादेखील करीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांची तयारी पूर्ण झाली असली तरी ऐनवेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे काय आदेश देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यावेळी नेतेमंडळीसोबत राज ठाकरे हे चर्चा करतील अन् त्यानंतर युतीबाबतचा निर्णय घेतील, असे वाटते. त्यामुळे आणखी काही दिवस तरी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका कायम राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची नजर मात्र आदेशाकडे लागून राहिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षाची नजर जागावाटपावर असणार आहे. मनसेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनकडून किती जागा सॊडल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यावर बरेच समीकरणे अवलंबून असणार आहेत. विशेष म्हणजे मराठी भाषिक मतदार एकत्र आल्याने त्याचा फायदा ठाकरे बंधूना होणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच दोन्ही पक्ष सावध भूमिका घेत आहेत. मनसे मुंबई महापालिकेच्या १०० पेक्षा अधिक जागा पदरात पडाव्यात यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे.
राज व उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन ही भावनिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मोठी घटना आहे. याचा पुढील परिणाम हे त्यांच्यातील चर्चेनंतरच ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू काय निर्णय घेणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.