
Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे धक्का बसला. या धक्क्यातून सावरत आता ठाकरे गटाने आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई महापलिकेचा गड कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. त्याचसंबंधी ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक लढण्यात येईल, असे सांगून ‘एकला चलो रे‘चे संकेत दिले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रणशिंग फुंकले असून शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असे सांगत त्यांनी स्वबळाचे संकेत देत पहिले पाऊल टाकले आहे. त्याचवेळी तुम्ही भ्रमात राहू नका, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह किस झाड की पत्ती असं म्हणत त्यांनी अमित शाहांना टोला लगावला.
राज्यातील सर्वच शिवसैनिकाचे मत आहे की एकटं लढा. तुमच्यात ती ताकद आहे? अमित शाह यांना आमची ताकद दाखवणार आहोत? अजून निवडणूक जाहीर झाली नाही. मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्यावेळी मला दिसेल तुमची तयारी झाली आहे, त्यावेळी कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेईन, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करीत शिवसैनिकांचे मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच यावेळी त्यांनी हिंदुत्त्व सोडलं नाही याचा पुनरुच्चारदेखील उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. विधानसभेतील पराभव धुवून काढण्याचा निर्धार शिवसेनेने केलेला आहे, त्यादृष्टीने पक्षाकडून पावले उचलली जात आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी अगोदरच आपल्या शिलेदारांना कामाला लावले आहे.
दुसरीकडे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरवण्यात आली. त्यानुसारच येत्या काळात काम करण्याच्या सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीस राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख हजर होते. बाळासाहेब ज्या प्रमाणे लढले तसाच मी लढणार आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी जावे. मी कुणालाच अडवणार नाही. मात्र, मी लढाई अर्धवट सॊडणार नाही शेवट्पर्यंत लढत राहणार, असे या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील शिवसेना भवनात ही बैठक पार पडली. या बैठकीस हजर असलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्याचवेळी देखील काही जिल्हा प्रमुखांनी यावेळी स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे येत्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.