Uddhav Thackeray : 'जनतेच्या मनातल्या 'CM'चा अस्तित्वासाठी संघर्ष! मुंडे, खडसेंनंतर आता ठाकरेही त्याच रांगेत...?

Maharashtra Chief Minister News : आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत, असे काही वर्षांपूर्वी म्हणणारे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा आता राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. खडसे यांची तर चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना शिवसैनिक आणि जनतेच्या मनात आहे, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजपच्या माजी मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी राज्यव्यापी संघर्षयात्रा काढली होती. त्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आली, त्यात या यात्रेचाही वाटा होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्याच्या दहा वर्षांनंतर मात्र त्यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी 'शिवशक्ती परिक्रमा' ही यात्रा काढावी लागली.

एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते. 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्वाकांक्षा जागी झाली. त्यांना ते पद मिळाले नाही. कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, मात्र त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेपासून खडसे यांचाही राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे, या संघर्षातूनच ते राष्ट्रवादीत गेले. आता ते पुन्हा भाजपचे दार ठोठावताहेत. मात्र, काही केल्या कडी उघडत नसल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) काही नेते उद्धव ठाकरे यांनाही या रांगेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कॅबिनेट मंत्री असताना आणि त्याच्या नंतरही आतापर्यंत पंकजा मुंडे यांना संघर्षच करावा लागत आहे. त्याचे कारण म्हटले फार छोटे आणि मोठेही आहे. एकनाथ खडसे यांनाही तेच कारण लागू होते. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते आणि आता उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. या तिघांत फरक इतकाच आहे की पंकजा मुंडे आणि खडसे यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः म्हणत नाहीत.

कॅबिनेटमंत्री असताना पंकजा मुंडे एकदा म्हणाल्या होत्या, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे! त्यावेळेसपासून त्यांच्या मागे संकटांचा फेरा लागला किंवा संकटांचा फेरा लावण्यात आला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पंकजा मुंडे या महिला व बालविकास मंत्री होत्या. त्यांच्या खात्यात चिक्की घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले.

Uddhav Thackeray
Mamata Banerjee : ममतादीदींचे 'हे' रूप 13 वर्षांत पहिल्यांदाच पाहिले; कधीच नव्हती अशी भाषा...

सध्या कॅबिनेटमंत्री असलेले त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. पंकजा मुंडे यांच्या खात्याशी संबंधित या कथित घोटाळ्याची कागदपत्रे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील याची सोय लावून देण्यात आली होती. ती कुणी लावली होती, हेही फार काळ लपून राहिले नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत बंधू धनंजय मुंडे सोबत असूनही पंकजा यांचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात राज्यातील राजकीय, सामाजिक समीकरणे बदलली आणि पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली.

नाथाभाऊ, म्हणजे एकनाथ खडसे यांनी स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे संबोधले होते. त्यांनाही त्याची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. घोटाळ्यांचे आरोप झाल्याने त्यांच्या मागे चौकशांच्या ससेमिरा लागला. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांवरही गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले.

दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र त्यांच्या प्रवेशाला भाजपमधून विरोध सुरू झाला. परिणामी, नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाची अधिकृच घोषणा लांबणीवर पडली. यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले, मात्र आता त्या पक्षातूनही त्यांच्या विरोधात सूर उमटू लागले आहेत.

Uddhav Thackeray
Sanjay Ghatge: ठाकरे गटाच्या माजी आमदाराला मिळाली परतफेड; पाठिंबा दिल्याने मुश्रीफांकडून मोठं 'गिफ्ट'

'उद्धव ठाकरे हे राज्यातील लोकप्रिय चेहरा...'

आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री (Chief Minister) आहोत, असे म्हणणे पंकजा मुंडे आणि नाथाभाऊंनी किती महागात पडले, हे यावरून लक्षात यायला हवे. आता या दोघांच्या मागे उद्धव ठाकरे यांचा नंबर लागतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारण ठरले आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वक्तव्य.

उद्धव ठाकरे हे राज्यातील लोकप्रिय चेहरा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, या शिवसैनिकांच्याच नव्हे, तर जनतेच्याही भावना आहेत. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची भावना आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मित्रपक्षांनी दिलेल्या चेहऱ्याला आपली मान्यता असेल, असेही ते म्हणाले होते. मात्र त्यांची ही मागणी मित्रपक्षांनी मान्य केली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना लोकप्रियता मिळाली होती, हे नाकारता येणार नाही.

पण आता संख्याबळावर मुख्यमंत्री कोण, हे ठरणार असल्याची भूमिका मित्रपक्षांनी घेतली आहे, असे असले तरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरील दावा सहजासहजी सोडणार नाहीत. अंबादास दानवे यांचे वक्तव्य त्यातूनच आले आहे. स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे, याचाही विचार दानवे यांनी करायला हवा.

Uddhav Thackeray
Dhangar Reservation : मी काय आमदार नाही; प्रत्येकानं मर्यादा ओळखून वागलं पाहिजे; प्रशांत परिचारक असं का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com