Kolhapur Politics: इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादानंतर पदाधिकाऱ्यांचे बंड शमवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू झालेल्या या नाराजी नाट्यानंतर तिसऱ्याचाच लाभ होऊन त्याला जिल्हाध्यक्ष पद मिळाले. तर ज्यांच्याच स्पर्धा सुरू होती त्यांना प्रदेश कार्यकारणीवर घेण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाचाच फलक झाकून ठेवत आपण कार्यकर्ताच म्हणून काम करूया, असा निश्चय केला आहे. ज्याप्रमाणे इचलकरंजीमध्ये भाजपची दोन कार्यालय अस्तित्वात आहेत, त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील इचलकरंजीत दोन कार्यालय पाहता येणार आहेत.
इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत ग्रहण पदाधिकारी निवडीनंतर देखील संपलेले नाही. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीत दोन गट होते. त्या पद्धतीने इचलकरंजी शहरात देखील राष्ट्रवादीचे कारंडे आणि अशोक जांभळे अशा दोघा पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालय होती. मात्र, राज्यात राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर कारंडे यांची विश्वासू विठ्ठल चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर कारंडे आणि जांभळे गट हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेले पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर जांभळे गटाने मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण विधानसभा निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांनी राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केल्याने त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले. रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपुस सुरू होते. त्यामुळे काही दिवस या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी देखील रखडल्या होत्या.
सुरुवातीपासूनच विठ्ठल चोपडे आणि बाळासाहेब देशमुख यांच्यात जिल्हाध्यक्ष पदावरून रस्सीखेच होते. पण मागून आलेले सुहास जांभळे यांनी यात बाजी मारली. तब्बल आठ महिन्यानंतर मुंबईत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये इचलकरंजीतील पदाधिकारी निवडी जाहीर केल्या. त्यात विठ्ठल चोपडे यांना प्रदेश सरचिटणीस, बाळासाहेब देशमुख यांना सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष, तर शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे यांना नियुक्त करण्यात आले.
पण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय चोपडे गटाच्या कार्यकर्त्यांना पटलेला नाही. मुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मुश्रीफ यांना विरोध असताना चोपडे गटाने राष्ट्रवादीची ताकद उभी केली असा समज चोपडे गटाच्या कार्यकर्त्यांना आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वेळेला पक्षाने राज्य पातळीवर संधी देण्याचे निमित्त करून बोळवण केली, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे दिलेल्या पदाला विरोध करत कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहुया, असा निर्णय केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी केवळ कार्यकर्ता म्हणून या पक्षात राहण्याची घोषणा दबक्या आवाजात केली आहे. नव्याने स्थापन केलेल्या कार्यालयाच्या नाम फलकावर कापड देखील झाकण्यात आले आहे.
तोंडावर महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत. रखडलेल्या निवडी व्हाव्यात यासाठी आमची बैठक झाली होती. वरिष्ठांनी दिलेला निर्णय मान्य करून पुढील कार्यवाही करण्याचे ठरले होते. मात्र निवडीत जाहीर झाल्यानंतर काहीजणांची नाराजी आहे. मात्र ही नाराजी दूर करून सर्वांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत अशी प्रतिक्रिया इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.